Wednesday, February 19, 2014

प्रेम



Valentine’s Day निमित्त भरपूर मेसेजेस येत होते, काही शुभेछ्या होत्या, काही प्रेम म्हणजे काय यावर होते तर काही फक्त बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड यांच्यात प्रेम नसून आईवडील, भाऊ, बहिण, मित्र यांच्यामध्ये सुद्धा प्रेम असते अश्या आशयाचे मेसेजेस होते, मग माझ्या मनात प्रेमाबद्दल लिहाव असा विचार आला आणि लिहित सुटलो.
या विषयावर तसं भरपूर साहित्य लिहिलं आहे. लेख, कथा-कादंबऱ्या, काव्यांमध्ये प्रेमाविषयी भरभरून लिहिलं आहे. प्रेमावर चित्रपट, गाणी, संगीत, नाटकं हि आहेत. तरीसुद्धा आपल्याला प्रश्न पडतो प्रेम म्हणजे काय? आणि त्यावर प्रत्येकाची आपापली मतं असतात.
माझ्या मनाने प्रश्न विचारला प्रेमाची सुरुवात कशी होते?(अर्थात मी प्रियकर आणि प्रेयसी च्या प्रेमाविषयी लिहितोय). प्रेम होण्याआधी एखाद्याला समोरची व्यक्ती किंवा व्यक्तीमधील एखादी गोष्ट आवडायला पाहिजे. मग ती आवड इतकी तीव्र होत जाते आणि आकर्षणात बदलते. इथं बरेच लोक फसतात या आवडीला किंवा आकर्षणाला प्रेम समजतात. म्हणजे लव अॅट फर्स्ट साईट हे फक्त उत्कट आकर्षण असते. मग सुरु होतो प्रवास सहवासाचा गाठी-भेटी होतात, हिंडणे, फिरणे, हॉटेल्स, पिझ्झा वैगेरे वगैरे सुरु होतं, थोडक्यात डेटिंग सुरु होते. गुलाबी दिवस असतात हे, आनंदी-आनंद गडे सारखं. जोडीदाराच्या सर्व गोष्टी आवडायला लागतात. तो आणखी हवाहवासा वाटतो. काही काळ जातो, एकमेकांची सवय झाली असते, त्याच्या/तिच्या व्यक्तीमत्वातल्या छोट्या छोट्या गोष्टी समजायला लागतात. काही निगेटिव्ह गोष्टी समोर यायला लागतात. याशिवाय अपेक्षा वाढायला लागतात, अॅडजेस्टमेंट करावी लागते. इथं खरी कसोटी असते, जरी निगेटिव्ह गोष्टी असतील, तरी तो व्यक्ती हवाहवासा वाटत असेल आणि त्याच्यासाठी वाट्टेल ते अॅडजेस्ट करायची तयारी असेल तर खऱ्या अर्थाने प्रेमाची सुरुवात व्हायला लागते. जर दोघांना निगेटिव्ह गोष्टी खटकत असतील तर लवकरच ब्रेक-अप होतं. एक जण अॅडजेस्ट करायला लागला/लागली तर त्या व्यक्तीला त्रास व्हायला लागतो आणि मग एकतर्फी प्रेम सुरु होतं. जर दोघांना एकमेकांचे निगेटिव्ह पाँइंट मान्य आहेत पण ते परिस्थितीशी अॅडजेस्ट करू शकत नाहीत तरी ब्रेक-अप होतं. खर प्रेम तेंव्हा सुरु होतं जेंव्हा दोघांनाही निगेटिव्ह गोष्टी मान्य असतात आणि ते दोघेही अॅडजेस्टमेंटची तयारी ठेवतात. बरेचसे प्रेमविवाह फेल होतात ते याच कारणामुळे, म्हणून जेंव्हा केंव्हा कोणाला वाटलं कि आपण प्रेमात पडलोय तर त्याने/तिने त्या व्यक्तीला जाणून घ्यायला थोडा वेळ घेतला पाहिजे.
प्रेम हि खूप गुंतागुतीची भावना आहे, ते व्यक्त करण्याच्या पद्धती पण निराळ्या असतात. काहीजण प्रेम शब्दात व्यक्त करतात, चांगल्या गुणांचं कौतुक करतात, स्तुती करतात. काही जण भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करतात. काहीजण काळजीतून प्रेम व्यक्त करतात, काहीजण आपल्या प्रेमीच्या सहवासात राहणे पसंत करतात. काही जण स्पर्शातून प्रेम व्यक्त करतात. बऱ्याचवेळा ह्या व्यक्त करण्याच्या पद्धतीलाच प्रेम समजले जाते आणि गोंधळ होतो. उदा. एकजण समजा भेटवस्तू देऊन प्रेम करतोय आणि त्याची प्रेयसी मात्र काळजी व्यक्त करून प्रेम करतीये आणि ती त्याला काहीच भेटवस्तू देत नसेल तर त्याला असा वाटू शकते कि ती माझ्यावर प्रेम करत नाही. बरेच जण स्पर्शालाच प्रेम समजतात आणि गफलत होते. प्रत्येक स्पर्श हा प्रेमाचा असतो असं नाहीये. एकमेकांच्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती जर समजून घेतल्या तर ५०% जोडप्यांचा संसार आणखी सुखी होईल असं मला वाटत.
प्रेम दुसऱ्यांदा होतं का हो? बऱ्याच लोकांना प्रेमभंग अथवा दुसऱ्या कारणामुळे अपेक्षित जोडीदार मिळत नाही. त्यावेळी त्याचं मन खिन्न झालेले असते, अश्या लोकांना मला नेहमी सांगू वाटत घाबरू नको तुला परत प्रेम होईल ह्याच्यापेक्षा चांगली व्यक्ती तुझ्या आयुष्यात येईल. मनाच्या जखमा कितीपण खोलवर असू द्या, कालांतराने त्या भरतात आणि मन परत फुलू शकते.
एकतर्फी प्रेमवीरांना सांगू वाटतं, ते तुझ्यासाठी मृगजळ आहे त्याच्या मागे कधी धावशील तर हातात काहीच लागणार नाही, उलट त्याच्या मागे न धावता बाकीच्या गोष्टीत लक्ष घाल आयुष्यात प्रगती तर होईलच पुढे जाऊन तुझ्या आयुष्यात एखादी चांगली व्यक्ती सुद्धा येऊ शकते.
मला वाटतंय खूप लिहिलंय प्रेमाबद्दल, सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे ना हा.
                                                 -डॉ. सारंग कोकाटे 

Wednesday, February 12, 2014

VIP



सकाळी ९ वाजता सरांसोबत राउंड संपला होता इतक्यात एक नवीन पेशंट भरती झाल्याचा मेसेज आला, मग मी आणि सर ७ व्या मजल्यावर पेशंट तपासायला गेलो. त्याला जुलाब झाले होते, २ दिवसात तो २ हॉस्पिटल फिरला होता, तिथे त्याला काही फरक पडला नव्हता म्हणून इथं आला होता. सरांनी तपासलं काही विशेष नव्हतं, सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते, एकंदरीत viral वाटत होतं. त्याला फक्त सलाईन लावलं तरी पुरेसं होतं २ दिवसात त्याचे जुलाब आपोआप थांबणार होते. आम्ही सिस्टरला सूचना दिल्या आणि तिथून बाहेर पडलो, २ मिनिटात सरांचा फोन वाजला, बोलण झाल्यावर मला म्हणाले मंत्रालयातून फोन होता तो पेशंट अमुक-अमुक मंत्र्याचा खास आहे म्हणे लक्ष ठेव. मी ठीक आहे म्हणालो. नंतर मी माझा युनिट चा उरलेला राउंड घेत होतो. जेमतेम १५ मिनिट झाली आणि मला फोन आला, पलीकडून "मी अमुक अमुक मंत्र्याचा PA बोलतोय, तुमच्याकडे आमचा एक पेशंट आहे तुम्ही काय लक्ष देत नाही राव आमच्या पेशंट कडे, त्याचं रक्त वाहतंय म्हणे." मी बघतो म्हणालो आणि तिथ गेलो. तर त्या पेशंटने त्याचा सलाईन लावलेला हात उठताना हलवला होता आणि त्यामुळे सलाईन त्याच्या शिरेतून जायच्या ऐवजी शिरेतून रक्त सलाईन च्या नळीत आल होत, ते फक्त हात सरळ ठेवलं कि व्यवस्थित होणार होत पण तिथ त्याने अख्खा वार्ड डोक्यावर घेतला होता, मी त्याला समजावलं आणि परत माझ्या कामाला लागलो, १/२ तासाने त्याचा एक माणूस मला भेटायला आला म्हणाला चला त्यांचे जुलाब काही थांबेनात, आमच्या डॉक्टरांना चांगलं जालीम औषधं द्या बघू, मी म्हणालो डॉक्टर? ते डॉक्टर आहेत? तो म्हणाला हो आम्ही सगळे त्यांना डॉक्टर म्हणतो, मी त्याला समजावलं कि जुलाब थांबायला थोडं वेळ लागेल, एका दिवसात ते थांबणार नाहीत थोडा वेळ लागेल. कसबसा १/२ तास झाला परत मला पेशंटचा फोन आला तुम्ही आत्ताच्या आत्ता या. मी गेलो, तो मला म्हणाला “मी २ हॉस्पिटल एवढ्यासाठी बदलले कारण त्यांच्या औषधाने माझं जुलाब थांबले नाहीत तुम्ही मला चांगलं औषधं द्या माझे जुलाब लगेच थांबले पाहिजेत”. मी त्याला म्हणालो “तुम्ही कशाचे डॉक्टर आहात?”. तो म्हणाला तस मी डॉक्टर नाही पण माझं उठन बसन डॉक्टरांच्यात असत आणि मला त्यातल सगळ कळत. मी परत त्याला सांगितलं तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत हे जे जुलाब आहेत ते कदाचित viral इन्फेक्शन मुळे असू शकते किंवा बाहेरच खाल्यामुळे आतड्याला irritation झाल्यामुळे झालेलं आहे आणि ते १-२ दिवसात आपोआप थांबेल, एका तासात ते थांबणार नाही. मग त्याने त्याच्या ओळखीच्या डॉक्टरला फोन लावला पलीकडून त्या डॉक्टरने मी काही बोलायच्या आतच मला बोलले “तू काय करतोस ते बरोबर आहे पण तो माणूस तुला शांत बसू देणार गपचूप त्याला लोमोटील सारखी एखादी गोळी दे आणि सोडून दे”. मी सरांना फोन लावला सर म्हणाले बर ठीक आहे त्यांच्या डॉक्टराप्रमाणे कर, मी ठीक आहे म्हणालो आणि त्याला तस सांगण्यासाठी त्याच्या रूम मध्ये गेलो तर तो काही ऐकायला तयार नव्हता म्हणाला आत्ताच्या आत्ता डिस्चार्ज द्या. मी लगेच डिस्चार्ज फोर्मालीटी सुरु केल्या आणि सरांना फोन केला म्हणालो सर तो डिस्चार्ज मागतोय, सर पण क्षणाचा विलंब न करता म्हणाले पटकन देऊन टाक. पुढच्या तासाभरात तो हॉस्पिटलच्या बाहेर होता. दुसऱ्या दिवशी सर म्हणाले बर झालं त्याला डिस्चार्ज केलंस ते, त्याच्यासाठी मला काल OPD मध्ये कमीतकमी १०-१५ वेळा फोन आले. मी मनातल्या मनात म्हटले सुंठा वाचून खोकला गेला. आधीच्या २ हॉस्पिटल मध्ये सुद्धा त्याने असंच केलं असाव. ही VIP माणस कधीच समाधानी नसतात म्हणूनच मंत्रालयाला त्यांच्या जुलाबाची दखल घ्यावीशी वाटते.
                                                 -डॉ. सारंग कोकाटे