Saturday, February 7, 2015

माणसाचा धर्म आणि धर्माचा माणूस 1

काही महिन्यांपूर्वी मला whatsapp वर एक विडियो आला होता, त्या मध्ये एका सलून दाखवलं होतं. त्या सलून मध्ये एक दुसऱ्या धर्माचा तरुण मुलगा दाढी करायला येतो, तो एका नोकरी साठी मुलाखतीला जाणार असतो. न्हावी आणि तो मित्र असतात. न्हावीला काही दिवसांपूर्वी त्या मुलाची आई भेटलेली असते आणि ती त्याला सांगत असते की ती त्याच्या मुलाच्या बाबतीत किती काळजीत आहे ते वगैरे, हे सगळ तो न्हावी त्या मुलाला सांगत असतो, तो त्याला म्हणत असतो कि “अरे जरा आई कडे लक्ष दे, ती आता म्हातारी झालीये, थकलीये, तिला तूच एक आधार आहेस.” तो मुलगा म्हणतो “हो आजच एका मुलाखतीला जायचं आहे, ती नोकरी मिळाली कि सगळं चांगलं होईल, म्हणूनच तुझ्याकडे दाढी करायला आलो. मुलाखतीला नीटनेटके जायला पाहिजे ना.” त्याचं बोलणं चालू असत, तो मुलगा दाढीसाठी बसलेला असतो, न्हावी त्याला फेस लावतो, आता वस्तऱ्याने तो दाढी करणार इतक्यात बाहेर गोंधळ सुरु होतो. तिथे जातीय दंगल सुरु झाली असते. त्या मुलाच्या आणि त्या न्हाव्याच्या धर्मांमध्ये तणाव निर्माण झालेला असतो. एका मिनिटात त्या सलूनमधील वातावरण बदलतं, तो तणाव त्या दोघांमध्ये येतो, त्यांचा संवाद खुंटतो, न्हावीच्या नजरेत राग दिसतो तर त्याच्या नजरेत भीती, न्हाव्याच्या हातात वस्तरा असतो, तो मुलगा त्याला विनवणी करायला लागतो इतक्यात न्हावी वस्तऱ्याने त्याचा गळा कापतो आणि हातात वस्तरा घेऊन जोरात ओरडत दरवाज्याकडे पळतो. तो दरवाज्याजवळ पोहोचतो इतक्यात बाहेरून “कट कट” असं कुणीतरी म्हणत आणि तो दंगलीचा आवाज थांबतो. न्हावी दरवाज्यातून बघतो तेंव्हा त्याला समजतं की इथं दंगलीचं शूटिंग चालू असतं. आता मात्र तो घाबरतो, त्याला जाणीव होते कि आपण काय करून ठेवलं हे. तो सलूनचं शटर ओढून घेतो. इथं विडियो संपतो.

तो विडियो संपला आणि माझ्या मनातले विचार सुरु झाले. बरेच दिवस मी यावर विचार करत होतो. मनात आलं यावर काही लिहाव पण हा विषय तसा खूप नाजूक आहे शिवाय बराच वादग्रस्त ही. त्यातून माझी कामाची धांदल म्हणून यावर लिहिणं राहून गेलं, पण पाकिस्तानात शाळेवर झालेला हल्ला आणि pk चित्रपट यामुळे परत माझे हे विचार डोके बाहेर काढू लागले आणि मग मी यावर लिहायचं ठरवलं. या विषयावर सुरुवात कशी करावी हा मला प्रश्न पडला होता.

वरच्या प्रसंगाबद्दल थोडं बोलूया. २ मित्र आहेत, वेगवेगळ्या धर्मातले, आधी त्यांना एकमेकांबद्दल आपुलकी होती पण अचानक धार्मिक तणाव निर्माण होतो आणि एकजण दुसऱ्याचा गळाच कापतो. हे चूक आहे कि बरोबर? हे धर्म आहे कि अधर्म? कोणता धर्म हे सांगतो कि आपल्याच मित्राला मारा म्हणून? अशी कोणती भीती वाटते कि आपण आपल्याच मित्राच्या, शेजाऱ्याच्या जीवावर उठतो? हि दंगल का घडते आहे याची शहनिशा आपण करतो का? जे लोक धर्माच्या नावाखाली अशी कत्तल करतात त्यांना त्यांचा धर्म कधी समजलाय काय? जेंव्हा दंगल घडते तेंव्हा त्याचा उदेश्य खरोखर धार्मिक असतो कि राजकीय वा व्ययक्तिक? धर्माची लोकांना गरज का आहे? धर्मानुसार प्रत्येकाचा देव वेगवेगळा असतो कि एकच? धर्माची सुरुवात कशी झाली? धर्म मानव निर्मित आहे का परमेश्वर निर्मित? जर परमेश्वर निर्मित आहे तर मग वेगवेगळी धर्म का निर्माण केली गेली? असे असंख्य प्रश्न मला पडले. त्यावर मी स्वतंत्र पणे विचार करायला लागलो. माहिती घ्यायचा प्रयत्न करू लागलो. एक मला नक्की समजलं कि जे घडलं ते काही धर्म नव्हत तर अधर्म होतं. स्वतःला धर्माचा माणूस समजणाऱ्या त्या न्हाव्याचा तो धर्म नव्हता.
क्रमशः

डॉ. सारंग कोकाटे 
sarangkokate@gmail.com

No comments: