Friday, July 10, 2015

माणसाचा धर्म आणि धर्माचा माणूस 4

सध्या पृथ्वीवर अस्तित्वात असलेले धर्म म्हणजे हिंदू, मुस्लीम, ख्रिचन, बौद्ध, ज्यू, जैन इत्यादी, प्रत्येक धर्मात अनेक जाती आणि पोटजाती पण आहेत. यातील हिंदू धर्म वगळता इतर सर्व धर्म हे कोण्या एका संताच्या शिकवणीवर आधारलेले आहेत आणि ते एक ईश्वरवादावर आधारित आहेत.
इतके दिवस धर्मावरती वाचतोय, एक प्रश्न मला सारखा पडत होता धर्माचा उद्येश्य काय? what is purpose of religion? प्रत्येक धर्मामध्ये आचरण कसे असावे, दुसऱ्याशी कसे वागावे, काय खावे, काय कपडे घालावेत, परमेश्वराची आराधना कशी करावी. असे नाना प्रकार सांगितलेत. थोडक्यात काय तर जगण्याच्या रिती सांगितल्यात, बरोबर! त्या कशासाठी? तर माणसाचे जगणे सुसह्य व्हावे, समाजात सुसूत्रता रहावी. माणूस शांततेत आणि आनंदात राहावा. हाच उद्येश्य असला पाहिजे, नाही का?  हा उद्येश्य कोणताही धर्म सध्या पूर्ण करतोय का? समाजात जातीय ताणताणाव आहे, दंगली घडतात, जाळपोळ होते, दुकानं लुटली जातात, स्त्रियांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष मारला जातो, युद्ध होतात, बॉम्बहल्ले होतात, असं का?
उदाहरण घेऊ, समजा ४ लोकांना सांगितलं कि तुम्ही गणिताचा वापर करा पण उत्तर हे १० आलं पाहिजे. हे १० तुमचं उद्दिष्ट आहे, तुमचं ध्येय आहे. पहिल्याने लिहिलं ५+५ =१०; दुसऱ्याने ५x२ =१०, तिसऱ्याने १५-५=१०; चौथ्याने २०/२=१०. सगळ्या पद्धती ह्या बरोबर, नाही का. मग कोणती पद्धत अवलंबवायची, मग हे चौघे एकमेकांशी भांडायला लागले माझी पद्धत तुझ्यापेक्षा सरस आहे म्हणून. धर्माच्या बाबतीत पण असंच आहे कि, सर्व धर्मांचा उद्येश्य सारखाच आहे कि, पद्धती वेगवेगळ्या आहेत. फक्त या पद्धतींच गणित वरच्या गणिताइतकं सोप नाही तर ते बरच क्लिष्ट आहे.
अडचण इथं आहे कि सर्वाना आपलीच पद्धत भारी वाटते आणि ते त्या दुसऱ्यावर लादू पाहतात. मग तो हिंदू असो मुस्लीम असो ख्रिश्चन असो बौद्ध असो किंवा आणखी कोणी असो. मग ते दहशतीने असो, प्रेमाने किंवा राजकारणाने असो किंवा पैसे देऊन असो.
दुसरी गोष्ट म्हणजे या क्लिष्ट प्रकारच्या धार्मिक भाषेमुळे, सामान्य माणसाला स्वतःच्या धर्माविषयी काही ज्ञान नसतं. त्यामुळे तो एका विशिष्ट अश्या व्यक्तींकडे जात असतो ज्याला धर्माविषयी ज्ञान आहे. (असं सामान्य माणूस मानतो) ज्यांना हिंदू लोकं साधू-संत म्हणतात, मुस्लीम मुल्ला-मौलवी, तर ख्रिश्चन प्रिस्ट म्हणतात. अश्या वेळी जे हे लोकं सांगतील त्याला सर्वसामान्य माणूस खर मानतो आणि त्या पद्धतीने वागतो. सामान्य माणूस अजिबात त्या गोष्टी पडताळून पहायची, त्यावर आकलन करायची तसदी घेत नाही. कारण एक तर त्याला ह्या व्यक्तींवर प्रचंड विश्वास असतो, दुसरं म्हणजे तो घाबरत असतो मी जर असे वेडेवाकडे प्रश्न विचारले तर माझं काही वाईट होईल का? समाज काय म्हणेल? तिसरं म्हणजे कुटुंबाची दोन वेळेची खळगी भरणे आणि संसार करणे यात तो इतका गढून गेलेला असतो कि या विषयावर विचार करायला वेळ देणे त्याला परवडणारे नसते. ह्या गोष्टींचा फायदा हि वरची मंडळी, राजकारणी मंडळी घेऊ पाहतात. भडक विधानं केली जातात, तरुण वर्गाला भडकावले जाते. कधी नीट लक्ष दिले तर लक्षात येते कि जास्ती जास्त दंगलींचे प्रमाण हे निवडणुकीच्या आधी, सणासुदीच्या काळात घडतात. प्रत्येक दंगलीमागे काहीतरी कारस्थान लपलेले असते. खरतर यात भरडला जातो सामान्य नागरिक. नाही का? पुढे याच दंगलीचा आधार घेतला जातो आणि तरुणांना सांगितलं जात/मनात येतं कि आपल्या धर्माच्या लोकांची काय अवस्था केली दुसऱ्या धर्मातल्या लोकांनी आणि परत हि धार्मिक तेढ पुढच्या पिढीमध्ये नुसती टिकवली जात नाही तर वाढवली जाते. मी MBBS ला असतानाची गोष्ट आहे आम्ही ३rd year ला होतो तेंव्हा धुळ्यामध्ये हिंदू-मुस्लिम दंगल झाली होती, सगळीकडे तणावाच वातावरण, सारख सारखं काहीतरी नवीन कानावर यायचं, अफवांचे उधान आले होते. अश्या सुन्न मानसिक अवस्थेत आम्ही होस्टेल च्या कट्यावर बसलो होतो, दोन जुनिअर पण होते दोन्ही धर्माचे, हिंदू होता तो उद्विग्न होऊन म्हणाला “साल्या तुमच्यामुळे असं होतं नेहमी, कापून काढलं पाहिजे सगळ्यांना.” मुस्लीम म्हणाला “मी काय केलंय आणि येऊन तर बघ मीच कापून काढेन.” ते दोघं एकमेकांच्या अंगावर गेले. मी त्यांना अडवलं म्हणालो “अरे तुम्ही दोघ चांगले मित्र आहात का उगाच भांडताय. हि जी काही दंगल घडलीय ती तुमच्या दोघांमुळे नाही झालीये. तुम्हाला जर कापून काढायचे आहे तर त्या ५-५० लोकांना कापा जे अत्याचार करत आहेत. त्यांच्या चुकीसाठी तुम्ही एकमेकांना का जबाबदार धरताय. तसं जर केलं तर पुढच्या दंगलीची जबाबदारी तुमच्या दोघांची असेल. कारण तुम्ही एकमेकांची मन कलुषित करता आणि दुसऱ्यांची सुद्धा.” दोघं ढसाढसा रडली. एक प्रकारचं दुष्टचक्रच होऊन बसलंय हे. नाही का?
दहशदवाद, संपूर्ण मनुष्यजातीच्या अवघड जागेचं दुखण होऊन बसलंय. हि जी माथेफिरू लोकं आहेत जे स्वतःला मुस्लीम समजतात, त्यांना इस्लाम समजलाय कि नाही देव जाणे. कारण इस्लाम मध्ये निरपराधी व्यक्तीला इजा करणे/मारणे हे पाप आहे. प्रत्येक दहशदवादी सगळ्यात पहिल्यांदा हेच करतोय. साधारण १००-१५० वर्षापूर्वी या गोष्टींचे पाळेमुळे सापडतील, युरोप-अमेरिकेमध्ये औद्योगिक क्रांती झाली, व्यापारानिमित्त अनेक युरोपियन देश जगभर प्रवास करू लागले, त्या काळच्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अरब-आफ्रिकन देशांमध्ये त्यांनी आपली पाळेमुळे रोवली. साहजिकच त्यांच्याबरोबर ख्रिश्चन धर्मप्रसारक तिथे पोहोचले. त्यांनी धर्माचा प्रचार-प्रसार सुरु केला. तिथे काही मुस्लीम व्यक्तींनी त्या विरोधात एक वैचारिक लढा सुरु केला, पुढे त्या संघर्षाने हिंसक वळण घेतलं, पुढे मोटारींमुळे खनिज तेलाची मागणी होऊ लागली आणि अरब देशात पैशाची बरकत आली. २ महायुद्धे झाली, रशिया आणि अमेरिका यांच्यात शीतयुद्ध सूर झाले. या देशांच्या तेलसाठा मिळवण्यासाठी छुप्या चढाओढी सुरु झाल्या आणि कट्टर मुस्लीम धर्मवाद्यांचा वापर अमेरिकेने रशियाचा विरोध करण्यासाठी केला. या काळात त्यांना भरपूर शस्त्रसाठा, पैसे पुरवण्यात आले. आता हेच राजकारण सगळ्या जगासाठी त्रासदायक ठरतंय. हा विषय एवढा गुंतागुंतीचा आहे, प्रत्येक देशाचं एक वेगळ राजकारण आहे. त्याची व्याप्ती आहे. यावर एखाद मोठ पुस्तक लिहिलं जाऊ शकतं. काहीही असो पण दहशद्वादामुळे सामान्य माणसाचेच हाल होतात, मग तो हिंदू असो मुस्लीम असो वा ख्रिश्चन, त्रास सगळ्यांना होतो. मनुष्याजातच नष्ट होते कि काय अशी भीती कधीकधी वाटते.
अंधश्रद्धा आणि धर्माचा जवळचा संबंध आहे. काही वर्षापूर्वी गणपती दुध पितोय म्हणून कित्येक लिटर दुधाची नासाडी झाली. अजूनही नरबळी सारखे प्रकार आपल्या देशात घडतात. दाभोलकर सारख्या माणसाची हत्या होते. जेवढा माणूस शिकतोय तेवढाच अंधश्रधाळू बनतोय असं वाटत. मेसेजेस फिरत असतात, शिर्डीतून हा मेसेज आलाय, ५ जणांना पाठवा म्हणजे भलं होईल नाहीतर काहीतरी वाईट बातमी कळेल. काय म्हणावं याला काही कळत नाही. गणपती उत्सवात डॉल्बी चालू असते गाणी काय तर “पोरी जरा जपून दांडा धर...”; “तुझा झगा ग....” आणि त्यावर दारू पिऊन धिंगाणा चालू असतो. असं करणाऱ्यांच्या आया-बहीणीचा चेहरा मला बघायचा आहे, त्यांची यावर काय प्रतिक्रिया आहे ती बघायचीय.

माझ्यासारख्या व्यक्तीची फार घालमेल होते हे बघून, मग शब्दातून, लिखाणातून ते व्यक्त होऊ लागते. तरीही मी आशा करतो कि आजचा तरुण कुठेतरी शहाणा होईल, स्वतःच आकलन करेल. स्वतःच्या धर्माविषयी जाणून घेईल, दुसऱ्या धर्माविषयी आदर ठेवेल. मी या दिवसाची वाट बघतोय कि प्रत्येक माणूस सद्सात्विवेक बुद्धीने वागेल, प्रत्येक गोष्टीचं आकलन करेल, पडताळून बघेल आणी माणसाला माणसासारखं वागवेल. कारण माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही.
                                                 -डॉ. सारंग कोकाटे