Saturday, September 29, 2018

प्रेम


दुपारचे 2 वाजले होते, आमच्या हिने डबा दिला नव्हता म्ह्णुन घरी जेवायला जात होतो. इतक्यात फ़ोन वाजला, पलिकडुन आवाज आलासर कुठं आहात? स्वामिजींनी अर्जंट बोलावलयं.’ मी तशीच गाडी वळवली. हॉस्पिटल च्या आयुर्वेदिक विभागामध्ये स्वामिजी बसले होते. तिथं न्युरोसर्जन आणी मठातील काही कार्यकर्ते बसले होते. तिथं पहील्यांदा त्या दोघांची आणी माझी भेट झाली. त्याला आधी बघितलं होतं खुपदा, अधुनमधुन मला स्माईल द्यायचा. तिला म्ह्णजे तिच्या बायकोला पहिल्यांदा बघतं होतो. दोघही तिशी पस्तिशीतली होती. स्वामींजींची ती मानसकन्या, आजारी होती आणी तिला तपासण्यासाठी मला बोलवलं होतं. 8-9 वर्षापुर्वी तिला स्तनाचा कॅन्सर झाला होता. रितसर तो कापण्यात आला केमो/रेडीयशन चा मारा करण्यात आला. 2-3 वर्षे बरी गेली नंतर उरलेल्या स्तनाने नंबर लावला. त्यालाही छाट्ण्यात आलं, पुन्हा एकदा केमो/रेडीयशन, पुढ़ं तो मेन्दुत पसरला, तिच्या दोन्ही पायांच्या आणी एका हाताच्या धमण्या कॅन्सरमुळे चोक झाल्या होत्या. त्या साठी सुद्धा सगळ्या आधुनिक उपचारपद्धती घेऊन झाल्या होत्या. आता फ़क्त वेदनामुक्त जगता यावं यासाठी औषधे होती. (अश्या दुखण्यात ती सुद्धा कमी पडतात) तिचं डोकं दुखत होतं, त्ती विव्ह्वळत होती. मी तपासलं, तिचा डावा डोळा बंद होता, सुजला होता, संपुर्ण अंगावर सुज होती, चेहरा काळवंडला होता. तो तिच्या डोक्यावर हात फ़िरवत तिला शांत करायचा प्रयत्न करत होता. नुकताच तिचा MRI Scan झाला होता त्यात मेंदुमधल्या गाठी(Brain Metstatic lesions) काही वाढलेल्या दिसत नव्ह्त्या, न्युरोसर्जन म्हणाला “अरे यार ब्रेन मे कुछ नही लगता”. “हा सर उसको left Maxillary sinusitis और left retro-orbiltal cellulitis है” (नाकाच्या बाजुला हवेच्या पोकळी असतात, त्या पोकळ्यांमध्ये आणी डोळ्यांच्या खोबणीमध्ये जंतूसंसर्ग झाला होता, सायनस चा त्रास आहे असं काही जण म्हणत असतात त्यातला गंभीर प्रकार) मी बोलत होतो “उसको हाय डोस मे स्टेरोइड चल रहा है तो इन्फ़ेक्शन के चान्सेस भी रेहते है”. “हा यार सही है पर इसका स्टेरोइड बंद नही कर सकते वरना ब्रेन मेट्स के बजेसे उसको बहुत पेन होगा और कोई रास्ता नही है”. सही है सर, उसको हाय डोस ॲटीबायोटीक्स देना पडेगा, ENT और Opthalmologist को भी involve करना होगा” मी. “सर सगळं करुया आपण” तो मध्येच बोलला. स्वामिजींनी पण नजरेने संमती दाखवली आणी त्याला म्हणाले “हे बघ जे काही करायचे ते इथंच करायचं, परत मुंबईला जायचं नाही, आधीच आपण भरपुर प्रयत्न केले आहेत. काय?” त्याने मान डोलावली. स्वामीजी माझ्याकडे बघुन म्हणाले “डॉक्टssर; तुम्हाला जे योग्य वाटते ते करा”.
ती रितसर ॲडमीट झाली, महागडी ॲटीबायोटीक्स आणी तिच्या बाकीच्या प्रोब्लेमसाठी बरीच जुनी नवी औषधे सुरु झाली. ENT surgeon नी बघीतले तिच्या सायनस ची एन्डोस्कोपी झाली. रिपोर्ट्स आले तिच्या सायनस मध्ये Mucormycosis नावाच्या बुरशीचा संसर्ग झाला होता. खुप चिवट आणी जिवघेण संसर्ग असतो हा. त्या साठी एक इन्जेक्शन असते ते महाग आणी रिस्की दोन्ही आहे. मी त्याला समजुन सांगितलं जर आपण इन्जेक्शन नाही दिलं तर त्या बुरशीचा संसर्ग वाढणार आणी 100% डेथ होणार. जर आपण औषधं दिलं तर एक म्हणजे तिच्या किडन्या खराब होऊन लघवी बंद होऊ शकते आणी डायलेसिस लागु शकते पण हे तिच्या बाबतीत होईल कि नाही या बद्दल काही सांगु शकत नाही. दुसरं म्हणजे एक इन्जेक्शन हे 3-4 हजार रुपयांना येते आणी दिवसाला आपल्याला 2-3 डोस द्यायचे आहेत तेही 2-3 आठवडे, म्हणजे दिवसाचा फ़क्त एका औषधाचा खर्च अंदाजे 10-12 ह्जार होणार आणी टोटल 2-2.5 लाख रुपयाचं फ़क्त एक औषध होणार, बाकीची औषधे, हॉस्पीटलचा खर्च, जर काही कॉम्पलिकेशन्स आले तर वेगळा खर्च होणार. एवढं सगळं करुन तिची वाचायची शक्यता 50-60% आणी तिच्या डाव्या डोळ्याची दृष्टी 100% जाणार.
त्याने 2 मिनिट पॉझ घेतला, मग हसला (तो चेहरा हसत होता पण डोळे रडत होते, मोठ्या प्रयत्नांनी त्याने डोळ्यातले पाणी आटवले आणी मला कर्टसी दाखवायला हसला) म्हणाला “सर आपण प्रयत्न करुयात पण एकदा मुंबईल्या डॉक्टरांशी आणी स्वामिजींशी एकदा बोलु का?”; मी “हो चालेल”.
मुंबईतल्या डॉक्टरची आणी माझी चर्चा झाली, स्वामिजींनी पण परवानगी दिली आणी ट्रिटमेंट सुरू झाली, 1 महिना ती ॲडमीट होती, कशीबशी त्या बुरशीविरुद्धची लढ़ाई ती जिंकली होती. अजुन पुढं लढ़ाया बाकी होत्या, त्याची कल्पना मला होती पण त्याचा डिसचार्ज दिवशीचा चेहरा बघितला आणि काही बोललो नाही. उगाच त्याच्या आनंदावर विरजण नको. “डॉक्टर, हिला पुढ़ं बरीच ट्रिटमेंट लागणार आहे हे माहितिये, तिला आता थोडी आयुर्वेदिक ट्रिट्मेंट करावी म्ह्णतोय तर तुमच्या ट्रिट्मेंट बरोबर ती चालु करु का?” मी “काही हरकत नाही फ़क्त आयुर्वेदिक डॉक्टरांना आपली सगळी औषधं दाखवा”. पुढ़ं ती आयुर्वेदिक विभागात होती.
पुढ़चे काही महीने ती तिथं होती. तो तिला रोज व्हीलचेयर वर फ़िरवायचा, कोवळ्या ऊन्हात बसवायचा, तिला रोज घास भरवायचा, अंघोळ घालायचा, तिचे शौचाचे कपडे बदलायचा, औषधं खायला घालायचा. अधुन मधुन मला बोलवायचा मी तिला तपासत असे औषधे देत असे, ति त्याच्यावर सगळ्या गोष्टींचा राग काढायची, डोकंदुखी वाढ़ली कि त्याला ओरडायची. तो मात्र हसत हसत तिची सेवा करायचा. खुप जास्त झालं कि लगेच मला बोलवायचा, मी काही सांगीतलं कि आतुन घाबरायचा पण मलाच म्हणायचा “होईल सर व्यवस्थीत”. मी काहीच न बोलता ट्रिट्मेंट द्यायचो.
हॉस्पिटलच्या लोकांकडुन त्याची माहिती मिळाली. ति त्याच्या मामाची मुलगी, त्यांच प्रेम जमलं, तिला तरुण वयातच स्तनाचा कॅंसर झाला, ट्रिट्मेंट झाली. त्या नंतर त्यांचं लग्न झालं. तिच्या आजाराबद्द्ल माहीत असुन त्याने लग्न केलं तेही घरच्यांचा विरोध पत्करुन. त्याला पुण्यात चांगली नोकरी होती, काही महीने त्यांचा सुखी संसार होता. नंतर दुसरा स्तन पण बिघडला, त्याने जिवाचं रान करुन ट्रिट्मेट केली, आता मात्र आजार पसरला होता. शेवटच्या स्टेजला होता. पण तो थकला न्हवता, लढत होता.
7-8 महिने गेले असतील, त्याचा मला फ़ोन आला “सर जरा येता का तिला त्रास होतोय”. मी बघीतलं, तिच्या फ़ुफ़ुसांना जंतुसंसर्ग झालेला, रोगप्रतिकारक शक्तिची आधीच वाट लागलेली, झालं परत ॲडमीट, व्हेन्टीलेटर, महागडी औषधं आणी लढ़ाई. आता मात्र तो खचलेला. त्याच्या एका नातेवाईकाला मी विचारलं “तो इतक्या पैशाची व्यवस्था कशी करतो? कारण गेले काही महीने हा इथंच आहे, दुसरं काही काम पण नाही करत”. “सर त्याच्या कंपनी ने त्याला पगारी सुट्टी दिलीये, त्याचं खुप चांगलं काम आहे म्हणुन, आणी तो कंपनी च्या प्रोजेक्टचं काम तो इथुनचं करायचा”. 3-4 दिवस गेले आता तिचं ब्लड प्रेशर कमी झालं होतं कितिही औषधे दिली तरी सुधारत नव्हतं, हळुहळु तिचा ऑक्सीजन पण कमी येत होता तेही व्हेंटीलेटरवर. मी त्याला म्ह्टलं आता आपण थांबुयात काही फ़ायदा नाही. त्याचा काही रिस्पॉस नाही. स्वामीजी आले त्यांनी तिला बघीतलं. मला म्हणाले “डॉक्टर काय करुयात?” मी “काही फ़ायदा होणार नाही प्रयत्न करुन”. स्वामीजी त्याला म्हणाले “आता थांबुया, तिला फ़ार त्रास देण्यात अर्थ नाही, कायss”. “तुम्ही म्हणालं तसं” तो जमिनीवर नजर खिळवुन बोलला. “डॉक्टर, व्हेंटीलेटर चालु राहु दे, नविन काय औषधं देऊ नका. जेंव्हा आपोआप होईल तेंव्हा होऊ दे”. पुढ़ं 2 तासातच तिची लढाई संपली आणी तो माझ्या गळ्यात पडुन ढसाढसा रडला.
असलं निरपेक्ष प्रेम मी या आधी कधी बघीतलं नव्हतं.
                                                   -डॉ. सारंग कोकाटे 

Sunday, July 15, 2018

डेंग्यूविषयी थोडंस....


डेंग्यू हा शब्द स्वाहिली भाषेतून घेण्यात आला, म्हणजेच break bone fever. तसा हा आजार पूर्वीपासून अस्तित्वात आहे, पण गेल्या काही वर्षांमध्ये ह्याचे प्रमाण वाढत गेले. सुदैवाने मृत्युदर मात्र कमी झाला आहे. तरीसुद्धा भारतामधल्या प्रमुख संसर्गजन्य आजारात ह्याची गणना होते.

डेंग्यू व्हायचं काय कारण?

डेंग्यू व्हायचं कारण म्हणजे त्याच्या विषाणूंची लागण. डेंग्यूचे 4 प्रकारचे विषाणू सापडतात, हे चारही विषाणू भारतात आहेत पण प्रकार-१ आणि प्रकार-२ यांचा संसर्ग प्रामुख्याने आढळतो.

या विषाणूंची लागण माणसाला कशी होते?

डेंग्यूच्या विषाणूंची लागण हि “एडीस इगीप्ती” या प्रकारच्या डासांमुळे होते. हे डास मुख्यतः मानवाच्या वस्तीनजीक आढळतात, त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात त्यामुळे त्यांना टायगर मॉस्किटो पण म्हणतात. हे डास स्वछ पाण्यात(भांड्यात, पत्र्याच्या डब्यात, टायरी, उघड्या टाक्या, बांधकामाची जागा, खड्डे अश्या ठिकाणी जिथे जास्त काळ पाणी साठून आहे) आपली अंडी घालतात. मुख्यतः पावसाळा हा त्यांचासाठी पोषक असतो. त्यामुळे डेंग्यूची साथ हि शक्यतो पावसाळ्यातच आढळते.

डेंग्यूची लक्षणे काय असतात?

डेंग्यूच्या लक्षणांची व्याप्ती अगदी किरकोळ तापापासून ते रक्तस्त्राव  व कोमा/मृत्यू पर्यंत असू शकतात, तीव्रतेनुसार ३ प्रकारच्या आजाराचे वर्णन वैद्यकीय पुस्तकात आढळतात. पहिला प्रकार आहे सौम्य डेंग्यूचा ताप, साधारणपणे थंडी, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, अंगावर लालसर गुलाबी चट्टे येणे अशी असतात. ७०% डेंग्यूचे रुग्ण हे या प्रकारात असतात. दुसरा प्रकार आहे त्यात वरच्या लक्षणांसोबत रक्तस्त्राव पण होतो, हा रक्तस्त्राव किरकोळ स्वरूपाचा असतो, खुपदा त्वचेच्या खाली, नाकातून, हिरड्यातून रक्तस्त्राव होतो, पण हा कमी प्रमाणांत आणि लगेच थांबणारा असतो. साधारण २०-२५% डेंग्यूचे रुग्ण हे या प्रकारात येतात. उरलेल्या ५% रुग्णांमध्ये हा रक्तस्त्राव हा भरपूर प्रमाणात असू शकतो, संडासावाटे, लघवीतून, नाकातून, कोणत्याही ठिकाणाहून हा रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. हाच तिसरा प्रकार. भरपूर रक्तस्त्रावामुळे रुग्णाचा रक्तदाब कमी होऊ शकतो, याला वैदकीय भाषेत Dengue Shock Syndrome असे म्हणतात. या प्रकारात मात्र रुग्ण दगावण्याची शक्यता असते.

डेंग्यूमुळे शरीरात काय बदल घडतात?

डेंग्यूच्या विषाणूंमुळे शरीरातील रोगप्रतिकार-शक्ती कार्यान्वयित होते, त्यामुळे शरीरात काही संप्रेरके आणि रसायने या विषाणूंना मारण्यासाठी तयार होतात. काही पांढऱ्या पेशी कार्यान्वयित होतात. एक प्रकारचं युद्ध सुरु होतं. यामुळे शरीरातल्या रक्तवाहिन्यामधून पाणी पाझरायला लागतं, रक्तबिंबिका(Platelets) कमी होऊ लागतात. त्यामुळे रक्तस्त्राव होण्याची शक्यता वाढते. एकूणच शरीरात पाण्याची कमतरता भासते.

डेंग्यूवर उपचार आहेत का?

अजून तरी डेंग्यूच्या विषाणूंना मारण्यासाठी प्रभावी औषध उपलब्ध नाही पण भविष्यात ते नक्की येईल. सुदैवाने डेंग्यूचे विषाणू हे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती नष्ट करू शकते त्यामुळे, हा आजार नक्की बरा होतो. तापावर नियंत्रण, शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढणे आणि क्वचित लालरक्तपेशी, रक्तबिंबिका देणे हि सध्याची उपचारपद्धती आहे.

डेंग्यू झाला तर काय करावे?

डेंग्यू झाला तर घाबरून न जाता, डॉक्टरांना भेटावे. शक्य तितकं तापावर नियंत्रण ठेवावे औषधे घेऊन, पाण्याने अंग पुसुन घेऊन. भरपूर प्रमाणात पातळ पदार्थ/पाणी प्यावे उदा: लिंबू पाणी, नारळपाणी, मोसंबी ज्यूस इत्यादी. आराम करणे. अंगावरच्या लाल चट्ट्यांवर लक्ष ठेवणे, कुठे रक्तस्त्राव होतोय का यावर लक्ष ठेवणे उदा. काळ्या रंगाची संडास, कॉफीच्या रंगाची उलटी, डोळ्यांमध्ये रक्तस्त्राव, दात घासताना आलेलं रक्त इत्यादी. तस जर झालं तर लगेच रुग्णालयात जाणे. अॅडमिट होणे.
लहान मुले, गरोदर स्त्रिया, म्हातारी माणसे, कॅन्सरचे रुग्ण, जे रक्त पातळ ठेवण्याच्या गोळ्यांवर आहेत(उदा. Warfarin)ते, हया लोकांना डेंग्यूचा धोका जास्त असतो. अशांनी डॉक्टरांच्या सल्यानुसार रुग्णालयात दाखल व्हावे.

रक्तबिंबिका रुग्णाला कधी द्यावेत?

डेंग्यू मध्ये रक्तबिंबिका(platelets) कमी होतात, कारण शरीराच्या प्रतिकार शक्तीची ती एक reaction आहे. जरी आपण बाहेरून रक्तबिंबिका दिल्या तरी त्या शरीरात मारल्या जातात. त्या मुळे फारसा फायदा होत नाही, असे काही शोधनिबंध वेगवेगळ्या नियतकालिकेत प्रसिद्ध झाले आहेत. रक्तबिंबिकांचा आकडा हा १.५ ते ४.५ लाख/घनमीमी इतका असतो. तो डेंग्यू मध्ये अगदी काही हजारावर जाऊ शकतो. साधारणपणे २०००० च्या खाली रक्तबिंबिका कमी झाल्या कि रक्तस्त्राव होतो. पण डेंग्यूच्या काही रुग्णांमध्ये अगदी २००० च्या खाली आकडा गेलाय आणि तरीपण रक्तस्त्राव झालेला नाहीये असा काही अनुभवी डॉक्टरांचा अनुभव आहे. National vector borne disease control programme च्या २००८ च्या मार्गदर्शक सूचनेनुसार, रक्तस्त्राव नसताना रक्तबिंबिका चा आकडा १०००० च्या खाली गेला तरच प्रतिबंधक उपाय म्हणून रक्तबिंबिका देण्यास हरकत नाही असं सांगितलंय. बऱ्याच अनुभवी डॉक्टरांचं मत आहे कि जो पर्यंत रक्तस्त्राव होत नाही तोपर्यंत रक्तबिंबिका देणे टाळावे, कारण सौम्य आणि मध्यम प्रकारच्या डेंग्यूमध्ये रक्तस्त्राव फारसा होत नाही. रक्तबिंबिकाचा आकडा काही हजारावर येईपर्यंत रुग्णाचा ताप गेलेला असतो व तो बरा होण्याच्या मार्गावर असतो. काही न करता अश्या रुग्णांच्या रक्तबिंबिका २-३ दिवसात आपोआप वाढतात. गरज फक्त एका गोष्टीची असते ती म्हणजे हे रुग्ण रुग्णालयात दाखल असले पाहिजेत आणि त्यांचावर बारीक लक्ष असलं पाहिजे. तीव्र प्रकारच्या डेंग्यू मध्ये मात्र रक्तबिंबिका द्याव्या लागतात, इतकंच काय तर लाल पेशी, प्लास्मा सारख्या गोष्टीसुद्धा गरजेनुसार द्याव्या लागतात.

रक्तबिंबिका देणे जिथं शक्य आहे तिथं टाळायचा आग्रह का?

कारण आधीच आपल्या देशातील रक्तपेढ्यातील रक्त पुरत नाही नेहमी रक्ताचा तुटवडा भासतो. दुसरं म्हणजे रक्तबिंबिकाचे आयुष्य फक्त ४-५ दिवस असते त्यामुळे ते फार काळ साठवून ठेवता येत नाही, मग त्याचा तुटवडा जास्त भासायला लागतो. आपल्याकडे २ प्रकारे रक्तबिंबिका साठवतात, पहिला आहे तो RDP(Random donor platelets) ह्यात एखाद्या व्यक्तीचे रक्त घेतले जाते त्यातले सर्व घटक वेगवेगळे केले जातात आणि त्यातून काही रक्तबिंबिका मिळतात. दुसरं म्हणजे SDP(Single donor platelets) यात एकाच व्यक्तीचे मशीनद्वारे फक्त रक्तबिंबिका काढतात ह्या रक्तबिंबिकाचे प्रमाण जास्त असते. ४-५ RDP पिशव्या = १ SDP ची पिशवी असं एक ढोबळ गणित आहे. एका RDP ची किंमत साधारण ८००-१५०० अशी असते तर SDP ची १२०००-१५००० असते. विनाकारण जर रक्तबिंबिका चढवल्या तर रुग्णाच्या खिश्याला कात्री लागतेच शिवाय रक्तबिंबिकाचा तुटवडा भासतो आणि ज्याला खरोखर गरज आहे त्याला त्या मिळत नाहीत. त्यामुळे गरजेप्रमाणे ह्याचे विनिमय होणे गरजेचे आहे.

भविष्यात डेंग्यूच्या विषाणूं नष्ट करण्यासाठी औषध किंवा लस निघेल. तसे प्रयोग सुरु आहेत. तोपर्यंत ह्या डेंग्यू विरुध्द आपल्याला लढायला लागणार आहे. त्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे डासांवर नियंत्रण. प्रत्येकाने आपल्या आजूबाजूचा परिसर साफ ठेवला, साठवलेले पाणी झाकून ठेवलं, असा कचरा किंवा पसारा काढला जिथे डास वाढू शकतात तर नक्कीच आपण डेंग्यूवर मात करू शकू.

-          डॉ. सारंग कोकाटे

Wednesday, May 2, 2018

डायलेसिस



दुपारचे ३ – ३.३० वाजले असतील कणेरीमठातल्या हॉस्पिटलमध्ये येऊन मला एक आठवडाच झाला होता. नुकतंच जेवण करून मी उरलेली OPD संपवत होतो. अचानक एक बाई, एक तरुण मुलगा आणि हॉस्पिटल मधला वार्डबॉय स्ट्रेचरवर एका माणसाला घेऊन आले. “डॉक्टर ह्यांना वाचवा, ह्यांना वाचवा” असं ती बाई ओरडत होती. मी पेशंट बघितला अर्धवट शुद्धीत होत, डाव्या पायाला गुडघ्यापासून खाली भलंमोठ ड्रेसिंग होतं. नाडीचे ठोके चालू होते, BP पण ठीक होतं, शरीरात पाणी आणि क्षारांची बरीच कमतरता भासत होती. मी त्यांना तपासत तपासत त्यांची माहिती त्यांच्या बायकोकडून घेत होतो. पन्नाशीच्या आसपास वय, एका संस्थेच्या शाळेत शिपाई म्हणून काम करत होता, शाळेच्या मैदानावर गवत काढत असताना त्याच्या पायाला काहीतरी चावलं. त्यावेळी त्याला काही वाटलं नाही, दुसऱ्या दिवशी त्याचा पाय सुजला, दुखायला लागला, ताप यायला लागला म्हणून त्यांनी गावतल्या एका सर्जन कडे त्याला   अॅडमिट केलं. पायला भरपूर सूज येऊन त्यामध्ये जंतुसंसर्ग झाला होता. सूज उतरायला आणि पायातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवायला मासावर एक आवरण असते त्याला चिरा द्यावा लागतो त्याला fasciotomy म्हणतात तसा चिरा त्या सर्जनने दिला होता आणि त्याला काही अँटीबायोटिक्स चालू केले होते. दुर्दैवाने ती जखम अजूनच चिघळली आणि शिवाय पेशंटच्या लघवीचं प्रमाण कमी व्हायला लागलं आणि त्याच्या रक्तात लघवीवाटे जे विषारी पदार्थ (युरिया आणि क्रीयाटेनीन) बाहेर टाकले जातात त्याचं प्रमाण वाढायला लागलं. याला वैद्यकीय भाषेत Acute kidney failure म्हणतात. सर्जनने त्याच्या परीने उपचार चालू ठेवले, पुढच्या ४ दिवसात त्याचं क्रीयाटेनीन ७ पटीने वाढलं आणि त्याची शुद्ध हरपायला लागली. तसं त्या सर्जनने यांना तातडीने डायलेसिस लागेल असं सांगून पाठवलं होतं. मी त्याचे सगळे जुने पेपर तपासले त्यात ३ वेगवेगळी अँटीबायोटिक्स होती ते तिन्ही किडनीला इजा करू शकत होते. मी त्या सगळ्या औषधांवर खाट मारली, केसपेपरवर उपचारांचा प्लान लिहिला आणि त्याला अॅडमिट करायला सांगितलं. पेशंटची बायको मला विचारायला लागली डायलेसिस कधी करणार म्हणून, मी तिला म्हटलं यांना डायलेसिसची गरज नाहीये मला थोडा वेळ द्या होईल सगळं व्यवस्थित. तिचा माझ्यावर काही विश्वास बसला नाही पण माझा आत्मविश्वास बघून ती काही बोलली नाही. तो पेशंट अॅडमिट झाला. मी माझे उरलेले पेशंट संपवत होतो. १५-२० मिनिटांनी मेडिकल ऑफिसरचा मला फोन आला “सर डायलेसिस ला कधी घ्यायचं?” मी “त्याची गरज नाहीये मी जस लिहिलंय तसं उपचार चालू कर.” “पण सर एवढं क्रीयाटेनीन आहे डायलेसिस लागणारच न त्याला” तो म्हणाला; “मी सांगितल्याशिवाय काही करायचं नाही, मी सांगतो तेवढं कर” मी त्याला दम भरला. अर्धा तास गेला असेल माझा शेवटचा पेशंट संपवत होतो तेंव्हा एक सिनियर ब्रदर आणि एक हॉस्पिटलचा सिनियर स्टाफ माझ्याकडे आला डायलेसिस बद्दल विचारायला लागला, मी त्यांना थांबवलं, पेशंट तपासला आणि त्यांना घेऊन पेशंटकडे घेऊन गेलो. त्याच्या सर्व नातेवाईक आणि माझ्या सर्व स्टाफला या म्हणालो आणि एका खोलीत त्यांना बसायला सांगितलं. एकतर मी तिथे नवीन आणि मी काहीतरी आगळावेगळा प्रयोग करतोय असं त्यांना वाटत होतं, माझ्यावर त्यांचा विश्वास कसा काय बसेल? मला त्यांना समजवायचं होतं कि डायलेसिस का लागणार नाही ते.
मी त्यांना Acute renal failure(ARF) आणि chronic renal failure(CRF) मध्ये फरक सांगितला, CRF च्या बहुतांश लोकांना डायलेसिस हे लागतेच आणि ते करावेच त्यात काही दुमत नाही. ARF मध्ये आपणास त्याच्या कारणांचा शोध घ्यायचा असतो. ह्या पेशंटला किडनीला इजा होण्याची ३ कारणे होती. पाहिलं म्हणजे जो काय जंतुसंसर्ग झाला होता त्यामुळे त्याच्या पायाच्या मांसल भागाला इजा झाली होती आणि त्याचे विषारी घटक रक्तात मिसळून किडनीला इजा करत होते, दुसरं म्हणजे त्या सर्जनने सर्वच्या सर्व अँटीबायोटिक्स किडनीला इजा होतील अशी वापरली होती आणि तिसरं म्हणजे त्या पेशंटचं क्रीयाटेनीन एवढं वाढतंय म्हटल्यावर त्या सर्जनने त्याच्या पाणी पिण्यावर आणि सलाईनवर जवळपास बंदी घातली होती, उलट यांना जास्त प्रमाणात सलाईन द्यावं लागतं जेणेकरून विषारी घटक dilute होऊन किडनीला होणारी इजा थांबली असती. CRF मध्ये पाणी पिण्यास आणि सलाईन ला मनाई असते. या सगळ्या गोष्टी मी एका कागदावर चित्र काढून त्यांना समजावून सांगितल्या माझा पूर्ण प्लान काय आहे ते समजावून सांगितलं. आता थोडा थोडा त्यांचा विश्वास माझ्यावर बसायला लागला. तो पर्यंत त्या पेशंटला जवळ जवळ २ लिटर सलाईन गेलं होतं आणि तो एकदम खणखणीत शुद्धीवर आला होता आणि उठून बसला होता, त्याला जवळपास २००ml लघवी पण झाली होती. (शक्यतो अश्या पेशंटला लघवीला नळी बसवतात आणि त्यांच्या लघवीच प्रमाण मोजतात) ते बघून पेशंटच्या बायकोने माझ्यासमोर हात जोडले तिच्या डोळ्यातून  घळघळा पाणी व्हायला लागलं; म्हणाली “४ दिवसांनी माझा नवरा जागा झाला”. मी म्हटलं “ चालायचं मावशी खायला द्या त्यांना.”
पुढे त्या पायाच्या चिघळलेल्या जखमा साफ करायला पाहिजे होती नाहीतर जंतुसंसर्ग आटोक्यात आला नसता, अश्या जखमा भूलेखाली साफ करतात (debridement म्हणतात याला). मी आमच्या हॉस्पिटलच्या सर्जनला कॉंल दिला. तोही म्हणाला “debridement लागेल याला पण एवढ्या क्रीयाटेनीनला कसं करणार, काय प्रोब्लेम झाला तर”. मी म्हणालो “सर ARF आहे काही होणार नाही तुम्ही करा”. तो “एकदा नेफ्रोलॉंजिस्ट(किडनी चा डॉक्टर) ला विचारा”. मी लगेच जवळच्या नेफ्रोलॉंजिस्टला फोन लावला, त्याने हिरवा कंदील दिला. debridment झालं. जखम हळू हळू भरायला लागली, त्याला चालता पण येऊ लागले, विशेष म्हणजे त्याला जवळजवळ दिवसाला २-२.५ लिटर लघवी होऊ लागली आणि क्रीयाटेनीन लेवल पण अर्ध्यापेक्षा कमी झाली, १५-२० दिवसांनी पेशंट घरी गेला. ३ महिन्यांनी त्याचं क्रीयाटेनीन लेवल नॉर्मल झालं तेही एकही डायलेसिस न करता. गेले दीड वर्ष हा पेशंट माझ्याकडे येतोय अजूनतरी त्याच्या किडन्या शाबूत आहेत. 
                                                   -डॉ. सारंग कोकाटे 

Monday, April 30, 2018

मृत्यु


“नाही!! नाही!! अस होऊ शकत नाही डॉक्टर प्लीझ त्यांना वाचवा प्लीईईईSSS” ती हुंदके देत देत बोलत होती “आमच्या आण्णांना असं होऊच शकत नाही, तुमच्या हातात सगळं आहे तुम्ही प्लीझ प्रयत्न करत राहा प्लीझ; प्लीझ, प्लीस्स्स” ना ती रडणं थांबवत होती ना मला बोलू देत होती. मी शक्य तेवढा चेहरा निर्विकार ठेवत ती शांत होण्याची वाट बघत होतो. वातावरणात प्रचंड अस्वस्थता, दुखः आणि नैराश्य होतं. शेजारी तिचा नवरा आणि तिचा भाऊ बसले होते. ते तिला शांत करायचा प्रयत्न करत होते, मागच्या खुर्चीवर तिची आई हुंदके देत होती. कारणही तसंच होतं, तिचे आण्णा (वडील) बेशुद्ध पडले होते सकाळी, नाकाला कांदा, चप्पल असले प्राथमिक उपचार केल्यावर उठत नाही म्हणून माझ्याकडे घेऊन आले. गाडी-घोडा हे सगळं जुळवून गावाकडंन माझ्या दवाखान्यात आणायला त्यांना २ तास लागले होते. मी बघितलं तेंव्हा नाडी मंदावलेली, श्वास पण मंदावलेला, पटकन intubate (श्वासोश्वास चालत नसेल तर श्वसनमार्गात एक प्लास्टिकची नळी घालतात आणि कृत्रिम श्वासोश्वास देतात) करून ventilator (कृत्रिम श्वासोश्वास देणारे मशिन) वर त्यांना घेतलं. त्यांचा डोक्याचा CT स्कॅन केला त्यात त्यांचा मेंदूमध्ये भलामोठा रक्तस्त्राव झाला होता. मी या बद्दलची माहिती त्या सगळ्यांना देत होतो.
तसे ते माझे नेहमीचे पेशंट, वय वर्षे ७८; ४ वर्षापूर्वी बायपास झाली होती, डायबेटीस होता आणि दोन्ही किडन्याही कामातून गेल्या होत्या. किडनीच्या आजारामुळे त्यांचा रक्तदाबही अधून मधून उसळायचा, गेल्या आठ-दहा महिन्यापासून रेग्युलर आठवड्यातून ३ वेळा डायलिसीस कराव लागत होतं आणि त्यांची तब्येत टिकवून ठेवण्यासाठी डझनभर गोळ्या चालू होत्या. डायलिसीस सुरु झाल्यापासून ते थोडे चिडचिडे झाले होते. एक आड एक दिवस यायचं ४ तास मशीनला जोडायचं, सुया खुपसणे, रक्त चढवणे आणि इंजेक्शनं या सगळ्याला कंटाळले होते ते. १५ दिवसापूर्वीच मला म्हणाले होते. “डॉक्टरसाहेब तुम्ही आमची सेवा करताय हे खरं आहे पण आता मला हा त्रास सहन होत नाहीये. मला जेवढं जगायचं होतं ते जगलो मी आणि खूप चांगला जगलो मी, प्लीज मला मरण द्या. एखादं इंजेक्शन द्या आणि माझा त्रास संपवा कायमचा.” याला काय उत्तर द्यायचं हे मला कळेना, “असं काय म्हणता बाबा तुम्ही अजून ठणठणीत आहात कि, अजून नातवंडाची मुलं बघायची आहेत तुम्हाला”. असं म्हणत मी आपली वेळ मारली. माझ्या वाक्यावर ते खुश नव्हते ते मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं, पण काय करणार? त्या दिवशी मृत्यु पण किती गरजेचा असतो याची जाणीव झाली खरी.
बाबा बेशुद्ध होते, बुबुळांची काहीच हालचाल नव्हती, स्वतःचा श्वासही नव्हता, जे काही श्वासोश्वास होते ते फक्त मशीनचे. मोनिटरवर नाडीचे ठोके आणि ECG ची वळणं दिसत होती म्हणून आपण त्यांना जिवंत आहेत म्हणायचे. न्युरोसर्जनचं मत घेतलं; तो म्हणाला “काही फायदा नाही ब्रेनडेड आहेत ते”. ब्रेनडेड म्हणजे माणसाचा मेंदू मरतो पण बाकीचे अवयव जिवंत असतात किंवा support वर चालू असतात. अश्या वेळी हे अवयव support वर कित्येक दिवस चालू राहतात, पण पेशंट कधी जगूच शकत नाही कारण मेंदूच नसेल तर पेशंट कसा राहील. आपले विचार, व्यक्तिमत्व, आठवणी, ज्ञान हे सगळं मेंदूमुळे तर असतं. माणसाला जिवंत राहायला सगळ्या अवयवांची गरज असते हे खर आहे पण जिवंतपणा असायला चांगल्या मेंदूची गरज असते.
शेवटी मी त्या सर्व नातेवाईकांना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या, त्यांनी विचार करायला ३-४ तास घेतले आणि सगळ्यांच्या संमतीने कायद्याच्या चौकटीत राहून ventilator बंद केला आणि काही वेळाने आण्णांची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांना मुक्तता मिळाली त्रासापासून कायमची.
असे बरेचं आण्णा/आक्का मी माझ्या आयुष्यात बघितलेत तेव्हा एक गोष्ट समजली ते म्हणजे तुम्ही काहीही करा मृत्यु हा येतोच एका प्रामणिक मित्रासारखा.
                                                   -डॉ. सारंग कोकाटे