Monday, April 30, 2018

मृत्यु


“नाही!! नाही!! अस होऊ शकत नाही डॉक्टर प्लीझ त्यांना वाचवा प्लीईईईSSS” ती हुंदके देत देत बोलत होती “आमच्या आण्णांना असं होऊच शकत नाही, तुमच्या हातात सगळं आहे तुम्ही प्लीझ प्रयत्न करत राहा प्लीझ; प्लीझ, प्लीस्स्स” ना ती रडणं थांबवत होती ना मला बोलू देत होती. मी शक्य तेवढा चेहरा निर्विकार ठेवत ती शांत होण्याची वाट बघत होतो. वातावरणात प्रचंड अस्वस्थता, दुखः आणि नैराश्य होतं. शेजारी तिचा नवरा आणि तिचा भाऊ बसले होते. ते तिला शांत करायचा प्रयत्न करत होते, मागच्या खुर्चीवर तिची आई हुंदके देत होती. कारणही तसंच होतं, तिचे आण्णा (वडील) बेशुद्ध पडले होते सकाळी, नाकाला कांदा, चप्पल असले प्राथमिक उपचार केल्यावर उठत नाही म्हणून माझ्याकडे घेऊन आले. गाडी-घोडा हे सगळं जुळवून गावाकडंन माझ्या दवाखान्यात आणायला त्यांना २ तास लागले होते. मी बघितलं तेंव्हा नाडी मंदावलेली, श्वास पण मंदावलेला, पटकन intubate (श्वासोश्वास चालत नसेल तर श्वसनमार्गात एक प्लास्टिकची नळी घालतात आणि कृत्रिम श्वासोश्वास देतात) करून ventilator (कृत्रिम श्वासोश्वास देणारे मशिन) वर त्यांना घेतलं. त्यांचा डोक्याचा CT स्कॅन केला त्यात त्यांचा मेंदूमध्ये भलामोठा रक्तस्त्राव झाला होता. मी या बद्दलची माहिती त्या सगळ्यांना देत होतो.
तसे ते माझे नेहमीचे पेशंट, वय वर्षे ७८; ४ वर्षापूर्वी बायपास झाली होती, डायबेटीस होता आणि दोन्ही किडन्याही कामातून गेल्या होत्या. किडनीच्या आजारामुळे त्यांचा रक्तदाबही अधून मधून उसळायचा, गेल्या आठ-दहा महिन्यापासून रेग्युलर आठवड्यातून ३ वेळा डायलिसीस कराव लागत होतं आणि त्यांची तब्येत टिकवून ठेवण्यासाठी डझनभर गोळ्या चालू होत्या. डायलिसीस सुरु झाल्यापासून ते थोडे चिडचिडे झाले होते. एक आड एक दिवस यायचं ४ तास मशीनला जोडायचं, सुया खुपसणे, रक्त चढवणे आणि इंजेक्शनं या सगळ्याला कंटाळले होते ते. १५ दिवसापूर्वीच मला म्हणाले होते. “डॉक्टरसाहेब तुम्ही आमची सेवा करताय हे खरं आहे पण आता मला हा त्रास सहन होत नाहीये. मला जेवढं जगायचं होतं ते जगलो मी आणि खूप चांगला जगलो मी, प्लीज मला मरण द्या. एखादं इंजेक्शन द्या आणि माझा त्रास संपवा कायमचा.” याला काय उत्तर द्यायचं हे मला कळेना, “असं काय म्हणता बाबा तुम्ही अजून ठणठणीत आहात कि, अजून नातवंडाची मुलं बघायची आहेत तुम्हाला”. असं म्हणत मी आपली वेळ मारली. माझ्या वाक्यावर ते खुश नव्हते ते मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं, पण काय करणार? त्या दिवशी मृत्यु पण किती गरजेचा असतो याची जाणीव झाली खरी.
बाबा बेशुद्ध होते, बुबुळांची काहीच हालचाल नव्हती, स्वतःचा श्वासही नव्हता, जे काही श्वासोश्वास होते ते फक्त मशीनचे. मोनिटरवर नाडीचे ठोके आणि ECG ची वळणं दिसत होती म्हणून आपण त्यांना जिवंत आहेत म्हणायचे. न्युरोसर्जनचं मत घेतलं; तो म्हणाला “काही फायदा नाही ब्रेनडेड आहेत ते”. ब्रेनडेड म्हणजे माणसाचा मेंदू मरतो पण बाकीचे अवयव जिवंत असतात किंवा support वर चालू असतात. अश्या वेळी हे अवयव support वर कित्येक दिवस चालू राहतात, पण पेशंट कधी जगूच शकत नाही कारण मेंदूच नसेल तर पेशंट कसा राहील. आपले विचार, व्यक्तिमत्व, आठवणी, ज्ञान हे सगळं मेंदूमुळे तर असतं. माणसाला जिवंत राहायला सगळ्या अवयवांची गरज असते हे खर आहे पण जिवंतपणा असायला चांगल्या मेंदूची गरज असते.
शेवटी मी त्या सर्व नातेवाईकांना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या, त्यांनी विचार करायला ३-४ तास घेतले आणि सगळ्यांच्या संमतीने कायद्याच्या चौकटीत राहून ventilator बंद केला आणि काही वेळाने आण्णांची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांना मुक्तता मिळाली त्रासापासून कायमची.
असे बरेचं आण्णा/आक्का मी माझ्या आयुष्यात बघितलेत तेव्हा एक गोष्ट समजली ते म्हणजे तुम्ही काहीही करा मृत्यु हा येतोच एका प्रामणिक मित्रासारखा.
                                                   -डॉ. सारंग कोकाटे 

Thursday, March 10, 2016

किंमत

सकाळचे १०-१०.३० वाजले होते, बाराची ड्युटी होती, घरी कुणी नव्हते, एकटेपणा मला खात होता, म्हटलं हॉस्पीटलला जाऊन बसावं, म्हणून आवरलं. इतक्यात माझा फोन वाजला, अनोळखी नंबर होता पण पलीकडून एक ओळखीचा आवाज आला “नमस्कार डॉक्टरसाहेब ओळखलंत का? संदीप (नाव बदललंय) बोलतोय कराडहून (गावही बदललंय)”. मी चमकलो हा संदीप म्हणजे लोकल राजकारणात उठबस असणारा कार्यकर्ता. “नमस्कार, तुम्हाला विसरून कसं चालेल, काय काम काढलं आज गरीबाकडे”. मी बोललो. “तुम्ही आणि गरीब?? गप्प बसा!!! बरं ते जाऊ द्या अहो आमचं एक पेशंट आहे, **** हॉस्पीटलला भरती केलीया, जरा आमच्याकरता बघून गेला असता तर बरं झालं असतं”. त्या हॉस्पिटल पासून मी फक्त १० मिनिटावर होतो. अनासाये माझ्याजवळ वेळही होता म्हटलं बघून येऊ. “१०-१५ मिनिटात येतो”, मी म्हणालो. “बरं बरं मग मी तिथल्या लोकास्नी तुमच्याबद्दल सांगून ठेवतो” एवढं बोलून त्याने मला पेशंटचे नाव गाव सांगितले.
***
थोड्याच वेळात मी तिथे पोहचलो. पेशंट एक पस्तीशीची बाई होती. तिचा नवरा, दीर आणि १०-१२ वर्षाच्या आसपास तिची २ मुलं, तिच्या भोवतीने उभे होते. २-३ दुसरे पेशंट, २ गुलाबी ड्रेस घातलेल्या नर्स आणि १ मेडिकल ऑफिसर व्यतिरिक्त तिथं कुणी नव्हतं. त्या बाईच्या एका पायाला भलं मोठं ड्रेसिंग केलं होतं. मी नमस्कार केला आणि माझी ओळख सांगितली. ते दोघे पुरुष लगबगीने माझ्याकडे सरकले आणि मला जरा बाजूला घेऊन तिच्या आजाराबद्दल सांगू लागले.
तिला एका पायाला गेल्या काही महिन्यापासून जखम झाली होती. त्याचं कारण असं होता कि तिच्या कमरेच्या मणक्यातील नसेवर दाब पडून ती खराब झाली होती, त्यामुळे त्या पायातली स्पर्श ओळखण्याची तिची क्षमताच गेली होती. त्यामुळे तिला लागलेले लवकर कळाले नाही आणि हळूहळू ती जखम खोल होत गेली आणि त्यात जंतुसंसर्ग झाला. तिचं एक महिन्यांपूर्वी मणक्याची याच कारणानिमित्त शस्त्रक्रियाही झाली होती. एका प्लास्टिक सर्जन कडे ती उपचार घेत होती त्या जखमेकरिता. त्या कुटुंबाची आर्थिक व्यवस्था अगदीच बिकट होती, हातावरच पोट आणि मुलं सोडून सगळेच कष्टकरी, शेतात राबून दोन घास कसेबसे मिळवायचे. त्यात आधी झालेला उपचारांवर खर्च त्यामुळे ते दोघेही काकुळतीला आलेले. ते नेहमी ज्या डॉक्टरकडे उपचार घेत होते त्यांनी सांगितले होते कि घोट्यापासून पाय काढावा लागेल कारण इन्फेक्शन अगदी घोट्याच्या हाडापर्यंत आत पसरलंय. पण ते बाहेरदेशी जाणार असल्याने त्यांनी त्यांच्या एका दुसऱ्या प्लास्टिक सर्जनकडे त्यांना पाठवलं. त्या डॉक्टरांनी पेशंटला सांगितलं कि पाय वाचवता येईल. थोडा वेळ लागेल आणि खर्चिकपण आहे. हा सगळा इतिहास सांगे पर्यंत तिथल्या वार्डमधल्या डॉक्टरने ड्रेसिंग उघडलं, आणि ती जखम मला बघायला मिळाली. ती जखम इतकी खोलवर होती अगदी तळपायातली हाडं दिसत होती, मास तर गायबच झालं होता, त्यातून पांढरा रंगाचा द्रव पाझरत होता शिवाय त्याची भयानक दुर्घंधी पसरली होती. क्षणभर त्या वासाने मला कसतरी झालं. तसं बघायला गेलं तर अश्या प्रकारच्या जखमा भरपूर बघितल्यात पण त्या दिवशी नको नको झालं, असो.
***
त्या सर्वांची, “पाय वाचावा” अशी भावना होती आणि ते साहजिकच होतं. मी स्वतःला काही प्रश्न केले, मनातल्या मनात. हा पाय पूर्ण बरा होण्याची शक्यता किती? बरा झालाच तर परत जखम होणार नाही याची शाश्वती किती? हे सर्व करण्यात किती खर्च होईल? किती वेळ ह्या उपचारासाठी लागेल? हे विचार मनात घोळत असतानाच पेशंटचा नवरा म्हणाला “डॉक्टर साहेब काय पण करा पण त्यो पाय वाचलं असा काही तरी मार्ग सांगा”.  मला त्याला कसं समजावून सांगावं हे कळेना? मी काही क्षण घेतले आणि मग बोलू लागलो, “हे बघा, पायाचा तळवा हा १५-२० छोट्या छोट्या हाडांनी एकमेकांमध्ये सांधलेला असतो, तिथं काही एकचं हाड नसतं. त्यावर मास, चरबी, इतर पेशी, त्वचा अश्या गुंतागुंतीची रचना असते. आता त्यांच्या तळपायाची त्वचा तर सोडाच पण मास पण नाहीये आणि जे इन्फेक्शन(जंतुसंसर्ग) झालंय ते फक्त वरवरचं नसून त्या हाडांच्या सांधलेल्या  कपारीत पण शिरलंय, त्यामुळे हे कितपत बरं होईल याच्याबद्द्ल जरा शंकाच आहे. ते डॉक्टर पाय वाचवायचा प्रयत्न करताहेत हे चांगलंच आहे पण त्यात ८०% अपयश येण्याची शक्यता आहे. शिवाय ह्या उपचाराचा खर्च किती येईल हे पण सांगता येणं अवघड आहे.” “खर्चाची काय काळजी नाय साहेब, आमचं चॅरिटी मधून काम होईल”. तो मध्येच माझं बोलणं तोडून म्हणाला. “चांगलं आहे” मी म्हणालो “पण एक गोष्ट मला इथं स्पष्ट करायची आहे कि जरी खर्च केला तरी अपयश येण्याची शक्यता दाट आहे. या गोष्टीची मानसिक तयारी असू द्या. मला मान्य आहे कि मी सुरुवातीलाच निगेटिव्ह बोलतोय पण जी काही वस्तुस्थिती आहे त्याची खरी कल्पना देणं माझं कर्तव्य आहे.” यावर तो म्हणाला “साहेब जर का तिचा पाय काढला तर तिला घरी बसून ऱ्हाव लागल, आम्ही एक तर गरीब काम केलं तरच पोटाला मिळल, कस करायचं आम्ही वो?” “खर आहे तुमचं अश्या प्रसंगाने माणसाच्या आयुष्य बदलते, पण त्यांना बसून रहाव काही लागणार नाही, कृत्रिम पायाच्या साह्याने त्या चालू शकतील, रोजची कामे करू शकतील आणि अशी बरीच उदाहरणे आहेत समाजात”. मी उत्तरलो. थोडा वेळ त्यांची समजूत घातली आणि माझ्या रोजच्या कामाला लागलो.
***
२-३ दिवस गेले असतील, मला परत फोन आला त्या पेशंटच्या दिराचा. “साहेब जरा वेळ आहे का?” मी “आहे की बोला”. “अहो तुम्ही जरा येता का, तुम्ही त्या डॉक्टरास्नी जरा सांगता का, कि आम्ही आमची जमीन विकू, पैका भरू, परंतु आमासनी चांगले उपचार द्या म्हणून”. तो काळकुतीला येऊन बोलला, मी विचारलं “का? काय झालं, ते काय बोलले काय?”. तो “ते काही नाय बोलले पर त्यांचे अशिस्टंट डॉक्टर बोलले, काय झालं आमचा भाऊ (पेशंटचा नवरा) त्यांना विचारत व्हता कि, अजून किती दिवस औषध द्यायची ते. तर ते म्हणाले सगळंच तुम्हाला फुकट पाहिजे, चांगले उपचार कसे होणार म्हणून, ओपेरेशन लागल म्हणत्यात, पैका भरा म्हणत्यात ५००००, आता अचानक कुठनं आणणार व्हो, २-४ दिवसात कायतरी जुगाड करतो. पर उपचार मात्र चांगले करा म्हणावं.” मी चमकलो, म्हणालो “अरे, पण तुमचं तर चॅरिटीमधून होणार होतं ना? मग आता हे काय”. “कुठंच काय, शहरातल्या लोकांच काय बी खर न्हाय पयले म्हणाले हुईल म्हणून आता नाय म्हणत्यात” तो वैतागून बोलला. “ठीक आहे मी तिथल्या चॅरिटी मधल्या माणसाशी बोलतो” असं म्हणून मी फोन ठेवला.
काही वेळाने मी तिथल्या चॅरिटी ऑफिस मध्ये गेलो, तिथल्या एका मॅडमशी बोललो. ती म्हणाली “ आमच्या इकडे चॅरिटीमध्ये उपचार घेण्यासाठी २ महत्वाच्या गोष्टी लागतात, एक म्हणजे ते दारिद्र्यरेषेखाली आहेत याचा पुरावा आणि दुसरं म्हणजे जे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करणार आहेत त्यांची फुकट उपचार करण्याची तयारी हवी. त्यांच्याजवळ पुरावा आहे पण ते डॉक्टर याला तयार नाहीत, आम्ही काय करणार”. आता ह्यांना चॅरिटीतून सवलत द्यायची नाही म्हणून हे कारण सांगताहेत कि डॉक्टरला ती म्हणतेय त्या प्रमाणे फुकट उपचार करायचे नाहीत हे काही कळेना. गुंता असा कि जो कोणी डॉक्टर होता त्याने हे काही स्पष्ट नातेवाईकांना सांगितले नाही, जो कोणी बोलला तो रेसिडेंट डॉक्टर (शिकाऊ डॉक्टर) होता. मी तिला म्हणालो “ ते सगळं ठीक आहे पण कुणी रेसिडेंट डॉक्टरने अश्या पद्धतीने बोलणं चांगलं आहे का? हॉस्पिटलच्या Reputation ला हे शोभतंय का? मुळातच त्याला हे काही बोलायचा अधिकार नाहीये.” ती म्हणाली “बरोबर आहे तुमचं म्हणणं, आम्ही घेऊ त्यावर काहीतरी action”.  मी निघालो त्या पेशंटच्या नवऱ्याला बोलावलं आणि सांगितलं कि, तुम्ही सरळ तुमच्या डॉक्टरकडे जा, जे काही घडलं ते त्यांना स्पष्ट सांगा आणि फी मध्ये सवलत मागा”.
***
त्या दरम्यान हि केसवर मी एका अर्थोपेडीक मित्रासोबत चर्चा केली, त्याच मत असं पडलं कि पाय काढला तर त्यांना हे बर आहे, कारण आता जरी ती जखम भरली त्यावर कृत्रिम त्वचा चढवली तरी पण पुढे काही दिवसांनी १००% पुन्हा तशीच जखम त्यांना होणार आणि शेवटी हा पाय काढावाच लागणार, दुसरं म्हणजे आता फार थोडा भाग काढायला लागेल, घोट्यापासून कृत्रिम पाय बसवला कि त्यांना त्यांच्या कामात काहीच अडचण होणार नाही उलट नंतर पाय काढला तर तो थोडा जास्त काढावा लागेल, जास्त तडजोड करावी लागेल आणि खर्चही दुप्पट होईल.
दुसऱ्या दिवशी फोन आला, मी विचारलं काय झालं म्हणून, पलीकडून नवरा बोलला “काही नाही साहेब पैसे भरायचे ठरलंय आजच २०००० भरले, ४-५ दिवसात उरलेले भरणार आहे.” मी विचारलं “बरं पण डॉक्टर काय म्हणाले?”, “काही नाही जर पाय पाहिजे असेल तर फुकट होत नाही आणि चॅरिटी पाहिजे असेल तर पाय काढून टाकूयात” तो हताशपणे बोलला. मी काहीच बोललो नाही, काय बोलावं हेच कळेना; “ जाऊ द्या साहेब, तिचा पाय चांगला होणं महत्वाचं” तो म्हणाला. मी त्याला, माझी आणि माझ्या मित्राची काय चर्चा झाली ते सांगितली. योग्य तो निर्णय घ्या असं सांगितलं. परत मला त्यांचा फोन काही आला नाही, कि काही नवीन कळाल नाही.
***
काही आठवड्यांनी मला दुसऱ्या एका कामानिमित्त त्या हॉस्पिटलला जाण्याचा योग आला. जाता जाता सहज मला ती पेशंट आठवली. मी चॅरिटी ऑफिसला गेलो, तिथल्या त्या मुलीशी ह्या पेशंट बद्दल विचारलं. ती म्हणाली “अहो कसले ते नातेवाईक, १००००० बिल झालं फक्त २०००० भरले आणि ऑपरेशन झाल्यावर पळून गेले, पैसे न देता.” मी चमकलो “अरे बापरे! पण तिचा पाय वाचला का?”. ती “ते काय मला माहित नाही, तुमच्याजवळ त्यांचा पत्ता आहे का?” मी नाही म्हणालो आणि तिथून निघालो. त्या पायाची काय किंमत हा प्रश्न मात्र अजून मनात घोळतोच आहे.
                                                   -डॉ. सारंग कोकाटे 

Saturday, July 5, 2014

प्रेग्नंसी

स्त्रीरोग व प्रस्तृतीशास्त्र या विभागात पोस्टिंग होती तेंव्हाची गोष्ट. मला या विषयात अजिबात रस नव्हता म्हणून मी ही पोस्टिंग शक्य तेवढं टाळत होतो. कधी न कधी मला ती करावी लागणारच होती. जाहीर होतं कि ती पोस्टिंग मी काही मन लावून केली नाही. मी फ़क़्त ओ. पि. डी. करत होतो. या ओ. पि. डी. मधलाच हा एक किस्सा.
सकाळची वेळ होती भरपूर पेशंट होते त्यामुळे आमच्या मॅडम दोन खोल्यात पेशंट बघत होत्या. मी एका खोलीत आणि दुसरी रेसिडेंट दुसऱ्या खोलीत असे पेशंट्स ची माहिती आधी घेऊन ठेवत होतो. तिशीच्या आसपास असलेली एक मध्यमवर्गीय बाई आत आली. रंग सावळा, नजरेत अस्वस्थता इकडे तिकडे बघायला लागली. मी तिला बसायला सांगितले आणि विचारलं काय झाल. बहुतांश स्त्रिया एका पुरुषाला त्यांचे प्रोब्लेम सांगायला कचरतात, अशा वेळी आम्हालाच कोंडी फोडावी लागते, इथंही असचं झाल, मग विचारलं “काही पाळीचा त्रास वैगेरे आहे का ताई?” ती म्हणाली “हो, मॅडम नाहीयेत का?”; मी “आहेत, येतील त्या तुम्ही मला सांगा, काही प्रोब्लेम नाही”. ती म्हणाली “माझी पाळी चुकालीये आणि मला ह्या डॉक्टरांनी इथं पाठवलयं” माझ्या समोर तिने चिट्ठी धरली. मी चिठ्ठी वाचली, तिला एड्स होता साधारण ७-८ वर्षापासून. तिला दोन मुली होत्या त्यातली धाकटी एड्सनी वारली होती, मोठीला आजार नव्हता. इतक्यात मॅडम आल्या, मी त्यांना माहिती सांगितली, डॉक्टरांची चिठ्ठी पण दाखवली. तिला आम्ही युरीन प्रेग्नंसी टेस्ट करून यायला सांगितले. १० मिनिटांनी ती टेस्ट करून आली. ती टेस्ट पॉझिटीव्ह आली म्हणजे ती प्रेग्नंट होती. तिला तिच्या या आजारपणामुळे आता मुल नको होतं म्हणून MTP साठी तिला काही औषधं, कायद्याची सोपस्कार पार पाडून तिला दिली. आता परत असं काही होऊ नये म्हणून FAMILY PLANNING चा सल्ला मॅडमांना द्यायचा होता त्याआधी त्यांनी तिच्या नवऱ्याची चौकशी केली. ती म्हणाली वर्ष झालं आम्ही एकत्र राहत नाही. “मग हे कसं?” मॅडमांनी विचारलं. ती म्हणाली “ते मी डान्स करते ना म्हणून झालंय”. आम्ही दोघं “म्हणजे?”. ती चिक असा आवाज करत म्हणाली “अहो मी कलानिकेतनात असते ना.” आमच्या डोक्यात प्रकाश पडला कि ही तमाशातली आहे ते (इतका वेळ आम्हाला असं वाटत होतं कि नवराच दोषी आहे). “कुणामुळे झालंय हे माहितीये का?” मॅडम. ती “नाही”. “अग तुझ्यामुळे त्याला आजार होईल कि, माहिती आहे का” मॅडम जवळजवळ ओरडल्याच “काळजी नाही का घ्यायची”. तिला मात्र या गोष्टीचं काहीच देणघेण नव्हतं. तिला आपल्यामुळं समाजातल्या कितीतरी कुटुंबाचं नुकसान होतंय याची जाणीवच नव्हती. मॅडम वैतागल्या होत्या त्यांनी खुणेनेच तिला जायला सांगितलं. ती गेली, आम्ही दोघं एकमेकांकडे बघायला लागलो. कसं होणार या समाजाचं हा प्रश्न आमच्या दोघांच्याही मनाला भिडलेला होता. 
                                                   -डॉ. सारंग कोकाटे 

Tuesday, May 6, 2014

संवाद


संध्याकाळची वेळ होती, मी आणि ती (बायको) सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल बघून सारस बागेजवळून जात होतो. तिला पावभाजी खायची इच्छा झाली म्हणून आम्ही तिथे गेलो. नेहमीप्रमाणे गर्दीतून गाडी काढत तिथे पोचलो. तिथं पावभाजीच्या दुकानदारांची खूप मोठी कॉम्पिटिशन चालू असते. प्रत्येकजण इकडे-इकडे म्हणून गिऱ्हाईकांना ओढत असतात. आम्ही विचार करत होतो कुठल्या दुकानावर जाऊन बसाव; इतक्यात एक मुलगा माझ्या गाडीच्या समोर आला, “साहेब इथं लावा गाडी आणि या बसा”. मी गाडी लावली आणि आम्ही दोघं टेबल खुर्ची लावली होती तिथं बसलो. काही सेकंद गेले. “काय खाणार पोरांनो” असा एक गावरान आवाज कानावर पडला. आमच्या शेजारी एक ७०री गाठलेला एक माणूस उभा होता. घोगरा आवाज, गावरान लहेजा (बहुतेक खानापूर, पानशेत भागातला असावा, मी अंदाज बांधत होतो), पांढरी खुंट वाढलेली दाढी, तिरकी मळकट गांधी टोपी, पांढरा कुर्ता (तोही मळलेला), सुरकुतलेला काळपट पण हसरा चेहरा आमच्याकडे बघत होता. मी विचारलं काय काय आहे. इतक्यात ती म्हणाली “मला फक्त पावभाजी पाहिजे”. (बहुतेक पावभाजी खायचा पक्का निर्णय केला असावा)
एक पावभाजी मी ऑर्डर दिली, तो “तुम्हासनी काय द्यायचं”. मला काही भूक नव्हती, मी ज्यूस मागवला. थोड्या वेळाने त्याने ऑर्डर आणली. न सांगता त्याने बटर मध्ये भाजलेले २ जास्तीचे पाव त्याने मुद्दाम ठेवले, “लागले तेव्हढे खा म्हणाला”.(जास्तीचे पाव खपवायची चांगली कल्पना होती) काही वेळ गेला मी त्याला विचारले “कुठं राहता तुम्ही? कुठल्या गावचे?” तो म्हणाला “इथंच राहतो पर्वतीच्या पायथ्याला, लहान होतो तवाच आईबाप गेले. अनाथ झालो, इकडची तिकडची कामं करून पोट भरायचो, गेल्या ३० वर्षांपासून इथ कामाला हाय, आधी ह्या मालकाचा बा होता त्यान रहायला एक खोपी दिली, पोटा पाण्यापुरता पगार हाय हो साहेब.” त्याची टेप सुरु झाली “एवढा म्हातारा झालो तरी बी एकदा सुदिक दवाखान्याची पायरी चढलो न्हाय बघा; बॉडी एकदम टकाटक. इथंन पुढं बी न्हाई चडणार. मेलो तरी चालल”. मी विचारलं असं का? तो म्हणाला “मग काय, हि डॉक्टर लोकं नुस्त लुटत्यात, अवं शेजारच्या अमक्या अमक्याच्या बा च्या छातीत दुखायला लागलं तवा त्याला अॅडमीट केलता, त्याच्या नाकातोंडात नळ्या घातल्या, चार ठिकाणी सुया घातल्या आणि  नुसती औषधं चालू पर काय फायदा तो जायचा तसा गेला. त्याच्या मुलान ४ लाखांचं कर्ज काढलं आता बसलाय आयुष्यभर फेडत. त्या डॉक्टरांनी आधीच सांगितलं असतं कि त्यो न्हाई वाचणार म्हणून तर एवढा खर्च झाला असता का त्याचा. डॉक्टर काय आपली तिजोरी भरेपर्यंत सांगतोय बघू, होईल, प्रयत्न चालू आहेत म्हणून, जवा तिजोरी भरली तवा सांगतोय काय होणार न्हाय म्हणून. त्याचा बाप तर गेलाच पर पैसा बी गेला. ह्या डॉक्टर माणसाचं काय खर नसतंय त्यांच्या नादी न लागलेलं बर.” मला त्याने एक सणसणीत कानफटीत मारल्याची भावना झाली. त्याच्या मनावर डॉक्टर म्हणजे पैसे लुटणारा माणूस हि संकल्पना ठासून भरली होती. हे ऐकताना मी तिच्याकडे(बायकोकडे) बघितले, ती माझ्याकडेच बघत होती कि आता माझा काय रिप्लाय असेल. मी एक डॉक्टर आहे हे त्याला सांगायची माझी हिम्मत झाली नाही. मी त्याच्या बोलण्यावर फक्त हसलो आणि त्याला बिल दिले सोबत ५० रुपये टीप पण दिली. कदाचित त्याला एका डॉक्टरकडून खुश करायचा एक छोटासा प्रयत्न असावा तो. ती मात्र माझ्यावर चिडली तुला काय कळतं का? असो टीप घेऊन तो मात्र खुश झाला म्हणाला इथनं पुढ कधी बी इकडं आलात कि इथच यायचं, ह्यो म्हातारा तुमच्या सेवेला इथंच सापडल.
ती घटना माझ्या मनातून काही जाईना. मी विचारात पडलो का बर ह्याला डॉक्टर बद्दल एवढी चीड निर्माण झाली? खरंच त्या डॉक्टर ने तिजोरी भरेपर्यंत त्या मुलाला लुटलं असेल का? नक्की काय झालं असाव? कुठं चुकलं असावं?
मला असं वाटत कि चुकतो तो संवाद. एखादा पेशंट अतव्यस्थ असतो, मरणाच्या दारावर असतो तर त्या पेशंट्स च्या नातेवाईकांशी डॉक्टरने पुरेसा वेळ देऊन त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना पेशंट्स च्या प्रकृतीबद्दल स्पष्ट कल्पना दिली पाहिजे. ते त्या पेशंट बद्दल काय निदान करतात, काय तपासण्या करतात आणि नेमकी काय उपचार पद्धती अवलंबतात या बद्दल त्यांना सांगितलं पाहिजे. विशेष म्हणजे या सर्व प्रयत्नात किती खर्च येऊ शकतो, किती प्रमाणात अपयश येण्याची शक्यता असते हे पण सांगण गरजेचे असते. दुसरी गोष्ट म्हंजे आपला जवळचा कुणी मृत्यूमुखी पडू शकतो ही कल्पनाच कुणी करू शकत नाही, त्यापेक्षा हे सत्य सहजासहजी स्वीकारले जात नाही. बहुतांश लोकांचा आता समज असतो कि आता हॉस्पिटल ला घेऊन आलोय तर होईल सगळे व्यवस्थित. खरी गोष्ट अशी आहे कि मृत्यू हा अटळ आहे. कधी ना कधी तो येणारच आहे मग तुम्ही कितीही प्रयत्न करा, जगातल्या सर्वात भारी दवाखाने फिरा किंवा भारी डॉक्टरांचा उपचार अवलंबवा त्या पासून काही सुटका नाही. जेंव्हा केंव्हा गंभीर रुग्णावर डॉक्टर उपचार करत असतो तेंव्हा तेंव्हा त्याने/तिने त्या रुग्णाच्या एकंदरीत परिस्थितीची कल्पना स्पष्टपणे नातेवाईकांना देणे गरजेचे आहे. कोणत्या उपचारपद्धती मुळे रुग्णाला फायदा होईल, बरा होण्याची शक्यता किती आणि त्यातून त्याचा खर्च किती या सगळ्या बाबी विचारात घेऊन उपचार केले पाहिजे. त्याच्या नातेवाईकांना मार्गदर्शन केले पाहिजे. थोडासा संवाद अश्या संवेदनशील गोष्टीसाठी आवश्यक असतो, नाही का?
                                                -डॉ. सारंग कोकाटे