Sunday, July 15, 2018

डेंग्यूविषयी थोडंस....


डेंग्यू हा शब्द स्वाहिली भाषेतून घेण्यात आला, म्हणजेच break bone fever. तसा हा आजार पूर्वीपासून अस्तित्वात आहे, पण गेल्या काही वर्षांमध्ये ह्याचे प्रमाण वाढत गेले. सुदैवाने मृत्युदर मात्र कमी झाला आहे. तरीसुद्धा भारतामधल्या प्रमुख संसर्गजन्य आजारात ह्याची गणना होते.

डेंग्यू व्हायचं काय कारण?

डेंग्यू व्हायचं कारण म्हणजे त्याच्या विषाणूंची लागण. डेंग्यूचे 4 प्रकारचे विषाणू सापडतात, हे चारही विषाणू भारतात आहेत पण प्रकार-१ आणि प्रकार-२ यांचा संसर्ग प्रामुख्याने आढळतो.

या विषाणूंची लागण माणसाला कशी होते?

डेंग्यूच्या विषाणूंची लागण हि “एडीस इगीप्ती” या प्रकारच्या डासांमुळे होते. हे डास मुख्यतः मानवाच्या वस्तीनजीक आढळतात, त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात त्यामुळे त्यांना टायगर मॉस्किटो पण म्हणतात. हे डास स्वछ पाण्यात(भांड्यात, पत्र्याच्या डब्यात, टायरी, उघड्या टाक्या, बांधकामाची जागा, खड्डे अश्या ठिकाणी जिथे जास्त काळ पाणी साठून आहे) आपली अंडी घालतात. मुख्यतः पावसाळा हा त्यांचासाठी पोषक असतो. त्यामुळे डेंग्यूची साथ हि शक्यतो पावसाळ्यातच आढळते.

डेंग्यूची लक्षणे काय असतात?

डेंग्यूच्या लक्षणांची व्याप्ती अगदी किरकोळ तापापासून ते रक्तस्त्राव  व कोमा/मृत्यू पर्यंत असू शकतात, तीव्रतेनुसार ३ प्रकारच्या आजाराचे वर्णन वैद्यकीय पुस्तकात आढळतात. पहिला प्रकार आहे सौम्य डेंग्यूचा ताप, साधारणपणे थंडी, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, अंगावर लालसर गुलाबी चट्टे येणे अशी असतात. ७०% डेंग्यूचे रुग्ण हे या प्रकारात असतात. दुसरा प्रकार आहे त्यात वरच्या लक्षणांसोबत रक्तस्त्राव पण होतो, हा रक्तस्त्राव किरकोळ स्वरूपाचा असतो, खुपदा त्वचेच्या खाली, नाकातून, हिरड्यातून रक्तस्त्राव होतो, पण हा कमी प्रमाणांत आणि लगेच थांबणारा असतो. साधारण २०-२५% डेंग्यूचे रुग्ण हे या प्रकारात येतात. उरलेल्या ५% रुग्णांमध्ये हा रक्तस्त्राव हा भरपूर प्रमाणात असू शकतो, संडासावाटे, लघवीतून, नाकातून, कोणत्याही ठिकाणाहून हा रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. हाच तिसरा प्रकार. भरपूर रक्तस्त्रावामुळे रुग्णाचा रक्तदाब कमी होऊ शकतो, याला वैदकीय भाषेत Dengue Shock Syndrome असे म्हणतात. या प्रकारात मात्र रुग्ण दगावण्याची शक्यता असते.

डेंग्यूमुळे शरीरात काय बदल घडतात?

डेंग्यूच्या विषाणूंमुळे शरीरातील रोगप्रतिकार-शक्ती कार्यान्वयित होते, त्यामुळे शरीरात काही संप्रेरके आणि रसायने या विषाणूंना मारण्यासाठी तयार होतात. काही पांढऱ्या पेशी कार्यान्वयित होतात. एक प्रकारचं युद्ध सुरु होतं. यामुळे शरीरातल्या रक्तवाहिन्यामधून पाणी पाझरायला लागतं, रक्तबिंबिका(Platelets) कमी होऊ लागतात. त्यामुळे रक्तस्त्राव होण्याची शक्यता वाढते. एकूणच शरीरात पाण्याची कमतरता भासते.

डेंग्यूवर उपचार आहेत का?

अजून तरी डेंग्यूच्या विषाणूंना मारण्यासाठी प्रभावी औषध उपलब्ध नाही पण भविष्यात ते नक्की येईल. सुदैवाने डेंग्यूचे विषाणू हे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती नष्ट करू शकते त्यामुळे, हा आजार नक्की बरा होतो. तापावर नियंत्रण, शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढणे आणि क्वचित लालरक्तपेशी, रक्तबिंबिका देणे हि सध्याची उपचारपद्धती आहे.

डेंग्यू झाला तर काय करावे?

डेंग्यू झाला तर घाबरून न जाता, डॉक्टरांना भेटावे. शक्य तितकं तापावर नियंत्रण ठेवावे औषधे घेऊन, पाण्याने अंग पुसुन घेऊन. भरपूर प्रमाणात पातळ पदार्थ/पाणी प्यावे उदा: लिंबू पाणी, नारळपाणी, मोसंबी ज्यूस इत्यादी. आराम करणे. अंगावरच्या लाल चट्ट्यांवर लक्ष ठेवणे, कुठे रक्तस्त्राव होतोय का यावर लक्ष ठेवणे उदा. काळ्या रंगाची संडास, कॉफीच्या रंगाची उलटी, डोळ्यांमध्ये रक्तस्त्राव, दात घासताना आलेलं रक्त इत्यादी. तस जर झालं तर लगेच रुग्णालयात जाणे. अॅडमिट होणे.
लहान मुले, गरोदर स्त्रिया, म्हातारी माणसे, कॅन्सरचे रुग्ण, जे रक्त पातळ ठेवण्याच्या गोळ्यांवर आहेत(उदा. Warfarin)ते, हया लोकांना डेंग्यूचा धोका जास्त असतो. अशांनी डॉक्टरांच्या सल्यानुसार रुग्णालयात दाखल व्हावे.

रक्तबिंबिका रुग्णाला कधी द्यावेत?

डेंग्यू मध्ये रक्तबिंबिका(platelets) कमी होतात, कारण शरीराच्या प्रतिकार शक्तीची ती एक reaction आहे. जरी आपण बाहेरून रक्तबिंबिका दिल्या तरी त्या शरीरात मारल्या जातात. त्या मुळे फारसा फायदा होत नाही, असे काही शोधनिबंध वेगवेगळ्या नियतकालिकेत प्रसिद्ध झाले आहेत. रक्तबिंबिकांचा आकडा हा १.५ ते ४.५ लाख/घनमीमी इतका असतो. तो डेंग्यू मध्ये अगदी काही हजारावर जाऊ शकतो. साधारणपणे २०००० च्या खाली रक्तबिंबिका कमी झाल्या कि रक्तस्त्राव होतो. पण डेंग्यूच्या काही रुग्णांमध्ये अगदी २००० च्या खाली आकडा गेलाय आणि तरीपण रक्तस्त्राव झालेला नाहीये असा काही अनुभवी डॉक्टरांचा अनुभव आहे. National vector borne disease control programme च्या २००८ च्या मार्गदर्शक सूचनेनुसार, रक्तस्त्राव नसताना रक्तबिंबिका चा आकडा १०००० च्या खाली गेला तरच प्रतिबंधक उपाय म्हणून रक्तबिंबिका देण्यास हरकत नाही असं सांगितलंय. बऱ्याच अनुभवी डॉक्टरांचं मत आहे कि जो पर्यंत रक्तस्त्राव होत नाही तोपर्यंत रक्तबिंबिका देणे टाळावे, कारण सौम्य आणि मध्यम प्रकारच्या डेंग्यूमध्ये रक्तस्त्राव फारसा होत नाही. रक्तबिंबिकाचा आकडा काही हजारावर येईपर्यंत रुग्णाचा ताप गेलेला असतो व तो बरा होण्याच्या मार्गावर असतो. काही न करता अश्या रुग्णांच्या रक्तबिंबिका २-३ दिवसात आपोआप वाढतात. गरज फक्त एका गोष्टीची असते ती म्हणजे हे रुग्ण रुग्णालयात दाखल असले पाहिजेत आणि त्यांचावर बारीक लक्ष असलं पाहिजे. तीव्र प्रकारच्या डेंग्यू मध्ये मात्र रक्तबिंबिका द्याव्या लागतात, इतकंच काय तर लाल पेशी, प्लास्मा सारख्या गोष्टीसुद्धा गरजेनुसार द्याव्या लागतात.

रक्तबिंबिका देणे जिथं शक्य आहे तिथं टाळायचा आग्रह का?

कारण आधीच आपल्या देशातील रक्तपेढ्यातील रक्त पुरत नाही नेहमी रक्ताचा तुटवडा भासतो. दुसरं म्हणजे रक्तबिंबिकाचे आयुष्य फक्त ४-५ दिवस असते त्यामुळे ते फार काळ साठवून ठेवता येत नाही, मग त्याचा तुटवडा जास्त भासायला लागतो. आपल्याकडे २ प्रकारे रक्तबिंबिका साठवतात, पहिला आहे तो RDP(Random donor platelets) ह्यात एखाद्या व्यक्तीचे रक्त घेतले जाते त्यातले सर्व घटक वेगवेगळे केले जातात आणि त्यातून काही रक्तबिंबिका मिळतात. दुसरं म्हणजे SDP(Single donor platelets) यात एकाच व्यक्तीचे मशीनद्वारे फक्त रक्तबिंबिका काढतात ह्या रक्तबिंबिकाचे प्रमाण जास्त असते. ४-५ RDP पिशव्या = १ SDP ची पिशवी असं एक ढोबळ गणित आहे. एका RDP ची किंमत साधारण ८००-१५०० अशी असते तर SDP ची १२०००-१५००० असते. विनाकारण जर रक्तबिंबिका चढवल्या तर रुग्णाच्या खिश्याला कात्री लागतेच शिवाय रक्तबिंबिकाचा तुटवडा भासतो आणि ज्याला खरोखर गरज आहे त्याला त्या मिळत नाहीत. त्यामुळे गरजेप्रमाणे ह्याचे विनिमय होणे गरजेचे आहे.

भविष्यात डेंग्यूच्या विषाणूं नष्ट करण्यासाठी औषध किंवा लस निघेल. तसे प्रयोग सुरु आहेत. तोपर्यंत ह्या डेंग्यू विरुध्द आपल्याला लढायला लागणार आहे. त्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे डासांवर नियंत्रण. प्रत्येकाने आपल्या आजूबाजूचा परिसर साफ ठेवला, साठवलेले पाणी झाकून ठेवलं, असा कचरा किंवा पसारा काढला जिथे डास वाढू शकतात तर नक्कीच आपण डेंग्यूवर मात करू शकू.

-          डॉ. सारंग कोकाटे