Saturday, August 26, 2023

“हेलो”, “डॉ. मंगरुळकर”

 



सकाळी ९  वाजता अंजू चा फोन आला मेडिसिन ऑफिस मधून, अंजू “सारंग, तुला मंगरुळकर सरांनी OPD मध्ये बोलावलंय आत्ताच्या आत्ता”. मी “काय झालं?”, अंजू “मला नाही माहित, जा भेट.” तिने फोन ठेवला. पोस्टिंग जॉईन करून फक्त ४-५ दिवस झाले होते. अचानक मेडिसिन विभाग प्रमुखांनी बोलावलंय म्हटल्यावर मला टेन्शन आलं. सर फार कडक शिस्तीचे आहेत वैगैरे कानावर पडलं होतं माझ्या. भीत भीतच मी OPD चा दरवाजा ठोठावला. “मे आय कमिन सर?”, आतून एक हाय पीच आवाज आला अस्खलित पुणेरी इंग्रजीत “येस कम इन”. मी आत गेलो मंगरुळकर सर समोर खुर्चीत बसलेले होते. साधारण उंची, गोरा रंग, चेहऱ्यावर आत्मविश्वासी तेज, काळेभोर डोळे, भेदक नजर. ती नजर मला निरखून बघत होती, नुसती बघत नव्हती तर मला नखशिखांत स्कॅन करत होती. माझ्या मणक्यातून भीतीची एक लहर सरकली. इतक्यात शेजारून आवाज आला “सर, हा सारंग”. मी शेजारी बघितलं आमचे लेक्चरर पवन सर उभे होते ते बोलले “उद्यापासून तुमच्यासोबत राउंड घेईल सर”. मी मनातल्या मनात ‘अरे बापरे मला HOD सोबत राउंड घ्यायचा आहे’. मंगरुळकर सर माझ्याकडे बघून म्हणाले “उद्या सकाळी शार्प ७ वाजता ८ व्या मजल्यावर थांब आणि तुझा फोन नंबर दे”. मी माझा नंबर दिला त्यांनी त्यांच्या मोबाईलवर सेव्ह केला आणि मला call केला म्हणाले “माझा नंबर सेव्ह कर”. मी तो केला. “आता तू जाऊ शकतोस” एवढं बोलून ते समोर टेबलावर काही कागद चाळू लागले. मला कळेना मी तिथून जाव कि न जाव, पवन सरांना ते समजल त्यांनी मला जाण्याचा इशारा केला. ती माझी मंगरुळकर सरांसोबत पहिली भेट. हि घटना २०१२ मधली आहे.

दुसऱ्या दिवशी शार्प ७ वाजता माझा फोन वाजला, मी ठरल्या प्रमाणे ८ व्या मजल्यावर उभा होतो. मी फोन उचलला “हॅलो” पलीकडून आवाज “डॉ. मंगरुळकर”. मी “येस सर”, सर “तू आलायस का?” मी “हो सर”; सर “ठीक आहे, मी खाली रिसेप्शन ला आहे लिफ्ट ने वर येतो”. मग हे नित्याचाच झालं. मी रोज त्यांची ८ व्या मजल्यावर वाट बघायचो, सर शार्प ७ वाजता रिसेप्शन कौंटरवर यायचे, तिथे रिसेप्शनिस्ट त्यांच्या पेशंटची लिस्ट द्यायचा, सर मग लिफ्ट ने सर्वात वरच्या मजल्यावर यायचे आणि आम्ही चालत राउंड घेत जायचो. हा कार्यक्रम संपायला ९-९.३० वाजायचे. या दरम्यान प्रचंड शिकायला मिळायचे. सर प्रत्येक वेळेस विचारयाचे, या पेशंट बद्दल तुला काय वाटते. त्याचे स्पष्टीकरण द्यायला लागायचे, logic सांगावे लागायचे. पहिला आठवडा मला काहीच कळत नव्हते, हळू हळू मला त्यांच्या कामाची पद्धत समजायला लागली, पेशंटची नेमकी माहिती कशी घ्यायची, कमी वेळेत त्या माहितीच्या आधारे वैद्यकीय निदान कसं करायचं, कुठल्या नेमक्या आणि गरजेच्या टेस्ट करायच्या, अनावश्यक टेस्ट कशा टाळता येतील आणि कमीत कमी औषधे वापुरून पेशंट कसे बरे करता येतील यावर सरांचा भर असायचा. सर नेहमी म्हणायचे OPD मध्ये येणाऱ्या ८०% पेशंटला फारसं काही नसत. ते म्हणायचे “माझी पेशंट बाबत एक default setting आहे कि त्याला काही झालेलं नाही, ते मानसिक आहे, पेशंटला हे prove करावं लागेल कि तो आजारी आहे.” त्यांच्या या settings चा आम्हा रेसिडेंट लोकांना फार त्रास व्हायचा कारण पेशंट हा खरोखर आजारी आहे आणि त्याची लक्षणे मानसिक नाहीत हे आम्हाला prove करायला लागायचं. आत्ता १०-११ वर्षानंतर सरांचं असं logic का होतं ते समजत.

पेशंट treat करताना सर नेहमी पेशंटच्या कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक स्थितीबाबत जागरूक असायचे. ते नेहमी म्हणायचे “सारंग, नेहमी लक्षात ठेव. उपचाराचे दुष्परिणाम फक्त पेशंटवर होत नाहीत तर त्याच्या कुटुंबावर पण होत असते; तेव्हा आपण त्या कुटुंबावर अन्याय तर करत नाही ना याची शहानिशा करत जा”. एक किस्सा मला चांगला लक्षात आहे. एक पेशंट, अल्कोहोलिक लिव्हर चा admit झाला रक्ताच्या उलट्या होत्या म्हणून रात्री उशिरा, त्याला ICU मध्ये ठेवण्यात आलेलं, त्याची BP कमी होती ventilator चालू होता. पेशंटच वय साधारण ६५-७० होत. त्याला एक मुलगा होता तो रिक्षाचालक होता, त्याला २ मुलं होती, बायको आणि आई (पेशंटची बायको) असं कुटुंब. कसबस हातावरल पोट होत बिचाऱ्याचं. त्यावेळेचा ICU च्या ventilator चा खर्च ८-१० हजार प्रतिदिवस होता, बाकीचे औषधे आणि तपासण्या वगैरे पकडलं तर तो खर्च ५-६ दिवसात १.५ – २ लाखाच्या वर गेला असता. सर आले रीतसर पेशंट तपासला आणि समुपदेशन कक्षात आम्ही आलो, पेशंटचा मुलगा आणि बायको आतमध्ये आली, सर टेबलावर बसले होते मी, आणखीन एक मेडिकल ऑफिसर, ICU registrar उभे होतो. त्या नातेवाईकांची अवस्था बघून सरांच्या मनात घालमेल झाली, त्यांनी हळूच माझ्याकडे बघितलं, मी माझे हात माझ्या ओठावर ठेऊन आता सर काय बोलतात याकडे लक्ष देत होतो. क्षणभर आम्हा दोघांची नजर खिळली, मला जाणवलं कि सरांना तो क्षण जड झालाय, त्यांना सर निगेटिव्ह सांगणार आहेत. हलकी शी त्यांचा कपाळावर आठी पडली आणि परत मोकळी झाली. क्षणापुरता संवेदनशील चेहरा अचानक निर्विकार झाला. सुरुवातीला सरांनी पेशंटच्या आजाराविषयी व गांभीर्य विषयी कल्पना दिली. त्याच्या उपचाराच्या खर्चाचा अंदाज दिला आणि उपचार करून काही फारसा फायदा होणार नाही हेही सांगितलं. तो मुलगा भावनेपोटी हात जोडून म्हणाला “सर, कितीबी खर्च येऊ द्या माझी तयारी हाय, रिक्षा विकतो, पर बापाला नीट करा”. सर म्हणाले “अरे आत्ता जरी बरे झाले तरी महिना दीड महिन्यांनी पुन्हा असं होणार तेंव्हा काय करशील”. “महीन्याच आयुष्य मिळाल तरी चालतंय साहेब तुम्ही करा प्रयत्न” तो बोलला. मग सर बोलले “अरे पण रिक्षा वगैरे विकल्यावर तू खाणार काय आणि कुटुंबाचं काय तुझ्या”. “काहीतरी जुगाड हुईल साहेब” त्याच प्रतिउत्तर. सरांनी परत समजावलं “तुझे वडील त्यांच्या पद्धतीने जसे जगायचे तसे जगलेत, त्यांना तू वाचण्याचा प्रयत्न करतोयस ते पण बरोबर आहे. पण जशी वडिलांची जबाबदारी तू घेतोयस तशी कुटुंबाची नाही का तुझ्यावर? त्यांचावर अन्याय का करायचा? तू तुझ उत्पन्नाच साधन विकायला निघालायस, काही आठवड्यांनी वडील राहणार नाहीत तेंव्हा तुझे कुटुंब तुला दोष देणार नाही का? एक डॉक्टर म्हणून जीव वाचविण माझ कर्तव्य आहे तरीपण मला हे वाटत कि इथं आपण थांबूया, फार काही करायला नको. त्या मुलाच्या आईने पण त्याला समजावलं “लेका, सायेब सांगत्यात ते खर हाय, उगा पोरांची पोटं मारू नगस, काय करणार ह्यास वाचवून, परत जाऊन पिणारच त्यो बाबा, त्यापेक्षा सायेब सांगत्यात तसं कर, आपल्या भल्याच सांगत्यात ते.” मोठ्या मुश्किलीने तो मुलगा तयार झाला. पेशंट संपला आणि कुटुंब वाचल. ७-८ महिन्यांनी त्या रिक्षावाल्यान मला हाक मारली, मी कोरीडोर मधून जात होतो. “डॉक्टर साहेब, मला तुमच्या सरासनी भेटायचं आहे, साहेबांनी सल्ला दिला, माझी रिक्षा वाचली, माझ मोठं पोरगं  १०वी त बोर्डात आलंय.” मी त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता यायला सांगितलं, सरांना सांगितलं त्यांचा चेहऱ्यावर समाधान दिसलं. दुसऱ्या दिवशी त्या माणसाचे पेढे मी आणि सरांनी आनंदाने खाल्ले. हि घटना माझ्या मनावर इतकी कोरली गेली, आज माझ्या व्यवसायात जेंव्हा मी असे सल्ले देतो. अनेकांना या गोष्टीचं अप्रूप वाटत काहींनी बोलूनही दाखवलंय. याच श्रेय मी मंगरुळकर सरांना देतो.

सर नेहमी वैज्ञानिक दृष्टीकोन व logic च्या माध्यमातून विचार करायचे, त्यामुळे त्यांना बऱ्याचदा लोकांच्या टीकेला सामोरे जायला लागायचे, काहीही झाले तरी ते आपले विचार सोडत नसत. एक असाच किस्सा घडला. सरांच्या सोसायटी मधील एक गृहस्थ रात्री हॉस्पिटल ला भरती झाले, त्यांना दररोज भरपूर सिगारेट ओढायची सवय होती त्यामुळे त्यांना स्मोकर्स कफ (COPD-Bronchitis) होता, सरांचे घरगुती संबध असल्याने सर त्यांना नेहमी सिगारेट बंद करायला सांगायचे पण तो गृहस्थ काही ऐकायचा नाही. त्याचा खोकला वाढला होता, खोकता खोकता त्याला उलटी झाली आणि उलटीतून रक्त पडलं, हे रक्त खोऊन फुफुस्सातून येतय का जठर-अन्न नलिकेतून येतय हे स्पष्ट सांगता येत नव्हते, कारण खोकला आणि उलटी हे एकत्रच यायचे. म्हणून याचा शोध घ्यायला सरांनी त्यांना भरती केलं होतं. सरांनी त्यांना “बेरियम स्वोलो” नावाची  क्ष- किरण तपासणी सांगितली. यात बेरियम चे सोल्युशन प्यायला द्यायचे व अन्न नलीकेचा क्ष- किरणांचा फोटो काढायचा. त्यात असे आढळले कि त्यांच्या अन्न नलिकेत काही दोष होता. मग सरांनी अन्न नलिकेची इंडोस्कोपी करायला सांगितली, ती रीतसर झाली त्यात अन्न नलिकेत तळाला गाठी वाढलेल्या दिसल्या, त्याचा तुकडा तपासायला घेतला, २ दिवसात समजलं कि अन्ननलिकेचा कर्करोग आहे म्हणून. CT scan झाले कर्करोग पसरला होता आणि उपचाराच्या पलीकडे गेला होता. सरांनी त्यांचे समुपदेशन केलं, आजाराची परिस्थिती सांगितली Pallitive care उपचार पद्धतीचा सल्ला दिला.  तासाभराने राउंड संपल्यावर मी व पवन सर पेशंटकडे गेलो, कर्करोग तज्ञाने सांगितलेले उपचार सुरु करायचे होते. त्या पेशंटची बायको चिडलेली होती, रागारागाने आम्हाला बडबडायला लागली, २ दिवस निदान लावायला उशीर झाला म्हणून तो पसरला, ती बेरियम टेस्ट outdated आहे, मी वाचल इंटरनेटवर, डायरेक्ट इंडोस्कोपी केली असती तर चालल असता.... ब्ला, ब्ला, ब्ला. आम्ही तिला शांत करायचा प्रयत्न करत होतो, तिला समजून सांगत होतो कि हा कर्करोग इतका पसरायला २-३ महिने जावे लागतात पण ती ऐकत नव्हती. ती म्हणाली मंगरुळकर चाप्टर बंद करायचा आहे आम्हाला, अमुक अमुक डॉक्टर कडे ट्रान्स्फर करा आमची केस. शेवटी आम्ही सरांना कळवलं, सर म्हणाले त्यांना जे योग्य वाटते ते करुदे. दुसऱ्या फ़िजिशिअन ने पण हेच सांगितल्यावर त्यांनी सरळ हॉस्पिटल बदललं, ८-१० दिवसांनी सरांनी आम्हाला विचारल नेमक काय झालं. आम्ही सर्व सविस्तर सरांना सांगितलं. मला वाईट वाटलेलं, मी म्हणालो सर एवढ logic कस कळल नाही तिला. सर हसून म्हणाले “हे बघ, हि एक मानसिक अवस्था असते, कुणावर तरी खापर फोडायचं असत. काय आहे इतके वर्ष तो माणूस माझ्याकडे दाखवत होता, सोसायटीत होता, त्याला समजावून सांगायचो पण सिगारेट काही सुटत नव्हती, त्याची बायको एकदाही त्याच्याबरोबर भेटायला आली नव्हती, कधी त्याच्या तब्येतीची विचारपूस केली नव्हती. आता अचानक इतका मोठा आजार समोर आल्यावर ते तिला स्वीकारू वाटत नव्हत, त्या सिगारेट मुळे हे घडलंय हे स्वीकारायचं नव्हत म्हणून ती अवस्था, असे प्रसंग येणार तुमच्या आयुष्यात, त्याचा सामना करायलाच पाहिजे. सगळे तुम्हाला चांगलं कधी म्हणणार नाहीत. कोण ना कोण वाईट म्हणणार आहेच. आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायच.” पुढे नंतर सरांनीच सांगितलं कि त्या पेशंटची दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये एका कँन्सर सर्जन ने सर्जरी केली आणि संध्याकाळी तो पेशंट मेला.

वेळे बाबतीत सरांना जरासुद्धा बेशिस्तपणा आवडत नसे. दीनानाथ ला दररोज सकाळी ७ म्हणजे, ७ वाजता सर हजर असायचे. आम्हा एका सुद्धा रेसिडेंट ला आठवत नाही कि सर लेट आलेत म्हणून. पहाटे ४.३०  - ५ वाजता उठणार, रोज सतार वाजवण्याचा रियाझ करणार. शार्प ७ ते ९ राउंड घेणार, ९-९.३० ला त्यांची प्रायव्हेट OPD सुरु व्हायची, ती लगबग १ वाजता संपायची, एक वाजता सरांना डिस्चार्ज समरी ची softcopy पाठवावी लागे किंवा सिनियर रेसिडेंट/लेक्चरर ने ती चेक करायची असा नियम होता. संध्याकाळी सर्व पेशंटचे updates त्यांना द्यायला लागायचे. चुकून आम्ही विसरलो तर रात्री ९.३० – १० च्या सुमारास त्यांचा कॉल यायचा. HOD असल्याने दर सोमवारी त्यांची OPD असायची. दररोज OPD ड्यूटी वर असलेल्या रेसिडेंट आणि मेडिकल ऑफिसर यांच्या नाश्त्याचा खर्च ते मेडिसिन department तर्फे करायचे. सर्व विद्यार्थांना ते समान वागणूक देत. कुणा विद्यार्थाला अडचण असेल तर मदत करायचे, वेळप्रसंगी हॉस्पिटल प्रशासनाशी विद्यार्थासाठी भांडण पण करायचे. आम्हाला आठवडी सुट्टी वगैरे काही प्रकार नसायचा, जेंव्हा कधी कुठल्या कामानिमित्त सुट्टी हवी असेल तर आधी आम्हाला कामासाठी एक लोकम द्यायला लागायचा त्या रेसिडेंट ची सही घेऊन मग सरांकडे रजा अर्ज द्यायला लागायचा. शक्यतो सर कधी अडवत नसत पण कारणमीमांसा मात्र करावी लागत असे. कधी हॉस्पिटल चे काम अडले नाही व मुलांचे सुद्धा. एकदम विन-विन.

सरांना शास्त्रीय संगीताची फार आवड, कुणी जाणकार व्यक्ती भेटले कि त्यांचाशी भरभरून बोलत असे. ते स्वत: टेक्नॉलॉजी वापरत असत, भारतात कॉम्पुटर अस्तित्वात असल्यापासून ते वापरत होते, त्या काळात ते digital OPD करत असे. IPD नोट्स व डिस्चार्ज समरी साठी त्यांनी व्हाईस रेकॉर्डिंग मशीन आणली होती. त्यात ते notes dectate करायचे व नंतर स्टाफ ते type करत. ते मराठी आणि ईंग्रजी ब्लॉग्स लिहित असत, त्याचं बघून मीही मग ब्लॉग्स लिहायला लागलो. ते आवर्जून माझे ब्लॉग्स वाचायचे आणि मला प्रोस्ताहन द्यायचे. माझ्यात असलेला एक सुप्त गुण त्यांच्यामुळे बाहेर आला.

त्यांचाकडे कुणी तक्रार घेऊन गेलं कि दोन्ही बाजू शांतपणे ऐकणार, त्याचं आकलन करणार आणि logic च्या मदतीने न्यायनिवाडा देणार. दोन्ही पार्टी ला काय समज द्यायची ते आपसूक बसायचं. अगदी कमी शब्दात, स्पष्ट.

एथिकल मेडिकल प्रक्टिस त्या माणसाने कधी सोडली नाही. एकदा एका कार्डीयोलोजीस्ट ने एका पेशंटला ४ stent घातले, खरतर त्याला बायपास गरजेचे होते पण त्या पेशंटला ऑपरेशन ची भीती वाटत होती म्हणून असं केलं, तेंव्हा सर त्या डॉक्टरवर खूप भडकले, तसा संयमी माणूस पण माझ्यासमोर त्या डॉक्टर ला झापायला चालू केले. मी त्यांचा रुद्रावतार तेंव्हा पहिल्यांदा बघितला. एकदा दुसऱ्या युनिट च्या एका कन्सल्टंट चे सर लोकम होते, त्यांचा पेशंटची माहिती द्यायला त्या युनिट ची एक सिनियर रेसिडेंट आमच्याबरोबर राउंड आलेली, तिला एका पेशंटची काही औषधे का चालू आहेत ते सांगता येईना. बिचारीला सर संपूर्ण राउंड संपेपर्यंत झापत होते. डॉक्टर असणे म्हणजे नेमकं काय असा क्लास तिचा घेतला, अर्थात तिच्याबरोबर मलाही जोडे मिळतच होते. ती घटना अजूनही ती रेसिडेंट विसरली नाही.

दर दसऱ्याच्या जवळच्या रविवारी, सर सर्व आजी-माजी रेसिडेंट डॉक्टर्सना पार्टी द्यायचे तेही कुटुंबासहित, मनमोकळे पणे सर्वांशी बोलायचे. त्यातल्या एका पार्टीत सर गमतीने माझ्या बायकोला सांगत होते, “मी याला घाबरतो, त्याने कधीच माझी परमिशन घेतली नाही, तो सरळ त्याचा निर्णय सांगतो.” मी चमकलो, मला समजेना मग सरांनी उदाहरण दिलं मला सुट्टी हवी असेल तर मी कशी मागायचो ते. मी आधीच लोकम प्लान केलेला असायचा. सरांना म्हणायचो “सर, मी अमुक अमुक तारखेला सुट्टी घेतोय, हि हि कामे पेडींग होती ती केलीयेत, माझ्या ऐवजी अमुक अमुक तुमच्या सोबत राउंडला येईल, त्याला सर्व कामे सांगितली आहेत.” सरांना मी कधीच असं नाही विचारल कि “मी अमुक अमुक तारखेला सुट्टी घेऊ का?” सर म्हणाले मला याला कधीच नकार देता आला नाही कारण याने कधीच परवानगी मागितली नाही. सरांचं बोलण्याच्या भाषेकडे एवढे बारीक लक्ष असायचं कि बस्स. माझी बायको पण हसायला लागली म्हणाली “घरीसुद्धा असंच असत याचं”. तेंव्हा पासून मी परमिशन साठी विचारयला लागलो, सर प्रत्येक वेळी हसायचे आणि म्हणायचे राहू दे लोकम कोण आहे ते सांग.  

दीनानाथ सोडताना सरांना भेटलो ग्रामीण भागात प्रक्टिस ला जातोय हे समजल्यावर त्यांना आनंद झाला, म्हणाले मी हि कर्जत ला सुरुवातीला प्रयत्न केले होते पण तिथल्या स्थानिक विचारसरणीची व राजकारणी लोकांनी मला टिकू दिलं नाही म्हणून मी आपलं पुण्यातच स्थायिक झालो. मला म्हणाले तुला जमेल, तू तिथला आहेस आणि तिथल्या लोंकाना वेगळ्या भाषेची सवय असते ती तुला जमते. त्या दिवशी मला त्यांनी भरभरून मार्गदर्शन केले आणि आशीर्वाद दिले. २-३ वर्षांनी स्वत:ची OPD सुरु करायची होती, माझी इच्छा होती कि सरांच्या हस्ते उदघाटन करायचं. मी सरांना एक फोन केला, सर एका शब्दात तयार झाले फक्त २ अटी घातल्या उदघाटन रविवारी ठेवणे आणि ड्रायव्हर दे म्हणाले. मी एका पायावर तयार झालो. सरांनी नियमाप्रमाणे वेळ घेतली. ठरल्याप्रमाणे वेळेत घरी आले, यथेच्छ जेवले, गप्पा मारल्या. मला म्हणाले मला २ तास झोपायचं आहे (दुपारची झोप त्यांना प्यारी होती) आमच्या गावाकडच्या साध्या घरात, एका खोलीत गाढ झोपले. संध्याकाळी फीत कापली, थोडं भाषण केलं आणि पुण्याला परत गेले. दुसऱ्या दिवशी सरांचा फोन आला म्हणाले “सारंग, कालचा दिवस फार छान गेला, खूप छान जेवलो, बऱ्याच दिवसांनी दुपारी गाढ झोप लागली रे, thank you for this”. मला म्हणजे आकाश ठेंगणे झाले. ती माझी शेवटची दीर्घ भेट.

नंतर अधून मधून फोन व्हायचा, कोविड आले, दसरा पार्टी झालीच नाही, पहिली कोविड लाट संपली, प्रचंड अनुभव आलेला, सरांशी गप्पा माराव्या वाटायचं आज जाऊ, उद्या जाऊ म्हणून राहून गेलं. दुसरी कोविड लाट आली एकेदिवशी समजलं सरांना कोविड झालाय आणि सर व्हेन्टीलेटर वर आहेत, घालमेल झाली, लॉक डाऊन मुळे जाता येईना. फोनवर सुजाता आणि पवन सरांकडून कडून माहिती घेत होतो. काही दिवसांनी ते बरे झालेत समजले. देवाचे आभार मानले. त्यांना फोन केला, छान बोलले. त्यांनी त्यांचा कोविड चा अनुभव लिहिला, तो वाचला, खतरनाक आहे. नंतर त्यांनी एक पुस्तक लिहिलं “Modern medicine: Getting Better or Bitter? reflections of clinician” नावाचं, सध्या अमेझॉन वर उपलब्ध आहे. मला त्यांनी फोन केला पुस्तकाबद्दल माझ्या प्रतिक्रिया मागितल्या. मी ते अर्धच वाचलं होतं, मी म्हणालो “सर तुमचे सगळे विचार तुम्ही यात टाकलंय असं दिसतंय, माझ अजून पूर्ण झालं नाही वाचून, पूर्ण करतो मग पुन्हा चर्चा करू”. सर “ठीक आहे” म्हणाले. अजून ते पूर्ण झाले नाही.

१ महिन्यापूर्वी समजलं सरांना Lung cancer आहे म्हणून, भेटायला गेलो पण त्यांना त्यात बुरशीचे संसर्ग झाल्याने भेटण्याचा योग आला नाही. बाकीच्याकडून कळाल होतं कि आता स्टेबल आहेत. नंतर भेटू म्हणून आलो परत. परवा सुजाताचा फोन आला सरांना देवाज्ञा झाली. आतलं काही हरवल्याची भावना झाली. कसाबसा पुण्यात पोचलो त्यांच्या पार्थिवावर डोक टेकलं म्हणालो “सर बरीच चर्चा बाकी राहिली, पुस्तक वाचण बाकी राहिलं, तुम्हाला भेटू शकलो नाही, मला माफ करा, मला माफ करा, मला माफ करा”.

असा माणूस पुन्हा होणे अवघड आहे.

11 comments:

Anonymous said...

अतिशय भावनावश झाले!
Sir मोठेच होते.अशी माणसं दुर्मिळच!
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

Sujata Rege said...

सुंदर लिहिले आहे, अगदी मनापासून. सर नेहमी स्मरणात राहतील आणि आपल्या सर्वांना त्यांची आठवण येईल. हे वाचून काही आठवणी ताज्या होतात. Thanks Kokya.

राघवेंद्र मंगरुळकर said...

अतिशय सुंदर भावनेला हात घालणारा लेख.

Pushkar Khair said...

सारंग, खूप छान लिहिले आहेस. सगळे डोळ्यासमोर दिसत होते.

Anju Gijawanekar Shende said...

सारंग छान लिहीले आहे. सर कायमच स्मरणात राहतील आणि त्यांच्या सोबतच्या आठवणी सुद्धा.

शिरीष याडकीकर said...

सारंग सूंदर लिहिले आहे

Anonymous said...

Very nice Dr.sarang

Shailesh Shankarrao Dombe said...

खूप छान लिहिले आहे सरांबद्दल. सर कायमच स्मरणात राहतील आणि त्यांच्या सोबतच्या आठवणी सुद्धा.

Anonymous said...

सर उत्कृष्ट लेखन प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देव अवतार घेतो. फक्त श्रद्धा आणि विश्वास यांच्यावरच ते नातं तयार होऊ शकत. आणि हेच घडले.

Anonymous said...

खूपच चांगला लेख आहे

Anonymous said...

लेख खूपच भावतोय