Friday, February 20, 2015

माणसाचा धर्म आणि धर्माचा माणूस 2



मला असंख्य प्रश्न पडले होते त्यातला एक मुख्य प्रश्न हा होता कि धर्माची निर्मिती ईश्वर निर्मित आहे काय? त्याआधी हा प्रश्न पडला ईश्वराच अस्तित्व आहे कि नाही? हा एक बराच वादाचा मुद्दा असल्याने, माझ्या लिहिण्याचा उदेश्य धर्माविषयी असल्याने आणि प्रत्येक धर्मात ईश्वराच्या अस्तित्वाला मान्यता असल्याने मी सध्या अस समजून चालतोय कि ईश्वर अस्तित्वात आहे. आता प्रश्न हा होता परमेश्वर म्हणजे काय? त्याची व्याख्या काय? थोडं-फार वाचल्यावर मला असं वाटलं ईश्वर म्हणजे या विश्वाचा निर्माता, जे आपल्याला दिसते, जे आपल्याला समजलेले आहे/नाही त्याची निर्मिती करणारा तो म्हणजे परमेश्वर, थोडक्यात एक अशी दिव्य गोष्ट ज्याने अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टी बनवल्या. हो ना?

म्हणजे ही पृथ्वी, पृथ्वीवरील जीवन, माणूस, प्राणी, पक्षी, झाडे, नद्या पर्वते, समुद्र सर्व ईश्वराने बनवले. इतकंच काय तर सूर्य, ग्रह-तारे, चंद्र, तारकामंडले(galaxies) पण ईश्वराने बनवलीत. आपल्या या सूर्यमालेत फ़क़्त पृथ्वीवरच जीवन आहे  असे आपण मानतो. असेच सूर्यासारखे असंख्य तारे मिल्की वे  नावाच्या तारकामंडलात आहेत. या तारकामंडलातील ताऱ्यांच्या भोवतीने करोडो-अरबो ग्रह फिरताहेत आणि त्यातल्या लाखो ग्रहावर जीवसृष्टी असण्याची दाट शक्यता आणि तशी अनुकूल परिस्थिती आहे. या सर्व ग्रहताऱ्यांचे आपले शास्त्रज्ञ शोध लावताहेत त्यांचा अभ्यास करताहेत, त्यावर जीवसृष्टी शोधताहेत.

हल्लीच्या नवीन तंत्रज्ञानाने आपल्याला दुर्बिणीतून खूप दूरच पाहता येतं, शास्त्रज्ञांना असे करोडो तारकामंडलं (Galaxy) सापडली आहेत आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
(हा विडियो बघा म्हणजे आपल्याला पृथ्वी केवढी आहे ते समजेल)


मुद्दा असा आहे हे सर्व परमेश्वराने बनवले आहे आणि या विश्वाची व्याप्ती आपल्या कल्पनेच्या पलीकडची आहे. जर ईश्वर एवढ सर्व बनवू शकतो तर धर्म पण त्यानेच बनवले कायजर आपण मानलं कि धर्म हे त्यानेच बनवलेत तर मग ते फक्त माणसासाठीच का? दुसऱ्या प्राण्यांसाठी का नाही? कोणीतरी म्हणेल किंवा असा युक्तिवाद करेल कि मनुष्य हा सर्वात श्रेष्ठ प्राणी आहे आणि त्याच्यासारखं या विश्वात कुणीच नाहीये म्हणून हा धर्म ईश्वराने तयार केला.
कल्पना करा सहारा वाळवंटासारख एक मोठं वाळवंट आहे आणि त्यात एका ठिकाणी मुंग्यांचे वारूळ आहे आणि या मुंग्यांना आपल्यासारखी आकलन करण्याची बुद्धी आहे. तरी पण त्यांचा आकार बघता त्यांची त्या वाळवंटात वावरण्याची क्षमता फक्त काही किलोमीटरचा दायरा आहे आणि त्यांच्या त्या दायरयात दुसरं कोणीच नाहीये. मुंग्या म्हणतात कि या वाळवंटाचा आमचं वारूळ हे एक मध्य आहे आणि त्यात दुसरं कुणीच नाहीये. त्याचं असं म्हणणं आहे कि ईश्वराने या विश्वाची(वाळवंट) निर्मिती आपल्यासाठीच केली आहे. तर त्यांची हि मान्यता किती खरी असावी? त्या वाळवंटात दुसरे जीव नसतील का? फक्त मुंग्यांना माहित नाही म्हणून दुसऱ्या जीव-जंतुंच अस्तित्व नाकारायचं का? आपणही या विश्वाच्या वाळवंटातील मुंगीसारखेच आहोत की. इतकंच काय तर मुंग्याच्या त्या वाळवंटाच्या तुलनेत आपलं विश्व कैकपटीने जास्त आहे. फक्त आपल्याला माहित नाही म्हणून दुसऱ्या ग्रहावर जीवसृष्टी नाही असं मानायचं का? आणि जर जीवसृष्टी असेल तर त्यामध्ये मानवाप्रमाणे बुद्धीजीवी नसतील का? असंही असू शकेल माणसापेक्षा जास्त प्रगतीशील असणारे परग्रही जीव असतील. एक theory अशी ही आहे कि या पृथ्वीवर आधी परग्रही प्राचीन काळी आले होते त्यांनी इथल्या जीव-जंतुंवर जनुकीय प्रयोग केले आणि अश्याच माकडावरच्या जनुकीय प्रयोगातून त्यांनी मानवाची निर्मिती केली. त्यांनाच आपण देव म्हणतो. असो.

दुसरी गोष्ट अशी कि माणसाच अस्तित्व फक्त ३० ते ४० हजार वर्षापासून माहित आहे, त्याआधी तो होता कि नव्हता याबद्दल नीटस माहित नाहीये आणि धर्मांचा इतिहास २००० ते ५००० वर्षापेक्षा जास्त नाही. काही प्राचीन संस्कृती होत्या त्याबद्दल १०००० वर्षापेक्षा जास्त माहित नाही. पृथ्वी आणि सूर्याचा जन्म मानवाच्या अस्तित्वाच्या लाखो वर्ष आधीचा आहे आणि आपल्या मिल्की वे तारकामंडलाचा तर सूर्याच्या जन्माच्या लाखो वर्ष आधीचा आहे. याचा अर्थ परमेश्वर आधीपासूनच अस्तित्वात आहे कारण त्यानेच हे सर्व बनवले ना. जर धर्माची निर्मिती ईश्वराने केली असा मानलं तर मग मानवाच्या अस्तित्वाच्या अगोदर कोणता धर्म होता? हा फार मोठा प्रश्न आहे. असा विचार करून बघू, संपूर्ण विश्व हे ईश्वराचं साम्राज्य आहे तर या विश्वाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत पृथ्वी केवढी असेल? संपूर्ण विश्वाचा फक्त १ खरब-खरब-खरब- खरब-खरब-खरब-खरब-खरब-खरब-खरब-खरब-खरब-खरब-खरब-खरब-खरब-खरब-खरब.............. भागापेक्षा पण कैकपटीने लहान. म्हणजे परमेश्वरच्या नजरेत एका ठिपक्यापेक्षा पण लहान. मग एवढ्याश्या लहान जागेत असणाऱ्या करोडो जीवजंतू पैकी फक्त मनुष्यासाठी एवढे धर्म निर्माण करायची त्याला गरज का वाटली असावी?

माझ्या मते धर्माची निर्मिती हि माणसानेच केली आहे आणि त्यासाठी त्याने ईश्वराचा एक tool म्हणून वापर केला आहे.

आता प्रश्न असा आहे कि धर्माची निर्मिती का केली किंवा झाली?

क्रमशः

Saturday, February 7, 2015

माणसाचा धर्म आणि धर्माचा माणूस 1

काही महिन्यांपूर्वी मला whatsapp वर एक विडियो आला होता, त्या मध्ये एका सलून दाखवलं होतं. त्या सलून मध्ये एक दुसऱ्या धर्माचा तरुण मुलगा दाढी करायला येतो, तो एका नोकरी साठी मुलाखतीला जाणार असतो. न्हावी आणि तो मित्र असतात. न्हावीला काही दिवसांपूर्वी त्या मुलाची आई भेटलेली असते आणि ती त्याला सांगत असते की ती त्याच्या मुलाच्या बाबतीत किती काळजीत आहे ते वगैरे, हे सगळ तो न्हावी त्या मुलाला सांगत असतो, तो त्याला म्हणत असतो कि “अरे जरा आई कडे लक्ष दे, ती आता म्हातारी झालीये, थकलीये, तिला तूच एक आधार आहेस.” तो मुलगा म्हणतो “हो आजच एका मुलाखतीला जायचं आहे, ती नोकरी मिळाली कि सगळं चांगलं होईल, म्हणूनच तुझ्याकडे दाढी करायला आलो. मुलाखतीला नीटनेटके जायला पाहिजे ना.” त्याचं बोलणं चालू असत, तो मुलगा दाढीसाठी बसलेला असतो, न्हावी त्याला फेस लावतो, आता वस्तऱ्याने तो दाढी करणार इतक्यात बाहेर गोंधळ सुरु होतो. तिथे जातीय दंगल सुरु झाली असते. त्या मुलाच्या आणि त्या न्हाव्याच्या धर्मांमध्ये तणाव निर्माण झालेला असतो. एका मिनिटात त्या सलूनमधील वातावरण बदलतं, तो तणाव त्या दोघांमध्ये येतो, त्यांचा संवाद खुंटतो, न्हावीच्या नजरेत राग दिसतो तर त्याच्या नजरेत भीती, न्हाव्याच्या हातात वस्तरा असतो, तो मुलगा त्याला विनवणी करायला लागतो इतक्यात न्हावी वस्तऱ्याने त्याचा गळा कापतो आणि हातात वस्तरा घेऊन जोरात ओरडत दरवाज्याकडे पळतो. तो दरवाज्याजवळ पोहोचतो इतक्यात बाहेरून “कट कट” असं कुणीतरी म्हणत आणि तो दंगलीचा आवाज थांबतो. न्हावी दरवाज्यातून बघतो तेंव्हा त्याला समजतं की इथं दंगलीचं शूटिंग चालू असतं. आता मात्र तो घाबरतो, त्याला जाणीव होते कि आपण काय करून ठेवलं हे. तो सलूनचं शटर ओढून घेतो. इथं विडियो संपतो.

तो विडियो संपला आणि माझ्या मनातले विचार सुरु झाले. बरेच दिवस मी यावर विचार करत होतो. मनात आलं यावर काही लिहाव पण हा विषय तसा खूप नाजूक आहे शिवाय बराच वादग्रस्त ही. त्यातून माझी कामाची धांदल म्हणून यावर लिहिणं राहून गेलं, पण पाकिस्तानात शाळेवर झालेला हल्ला आणि pk चित्रपट यामुळे परत माझे हे विचार डोके बाहेर काढू लागले आणि मग मी यावर लिहायचं ठरवलं. या विषयावर सुरुवात कशी करावी हा मला प्रश्न पडला होता.

वरच्या प्रसंगाबद्दल थोडं बोलूया. २ मित्र आहेत, वेगवेगळ्या धर्मातले, आधी त्यांना एकमेकांबद्दल आपुलकी होती पण अचानक धार्मिक तणाव निर्माण होतो आणि एकजण दुसऱ्याचा गळाच कापतो. हे चूक आहे कि बरोबर? हे धर्म आहे कि अधर्म? कोणता धर्म हे सांगतो कि आपल्याच मित्राला मारा म्हणून? अशी कोणती भीती वाटते कि आपण आपल्याच मित्राच्या, शेजाऱ्याच्या जीवावर उठतो? हि दंगल का घडते आहे याची शहनिशा आपण करतो का? जे लोक धर्माच्या नावाखाली अशी कत्तल करतात त्यांना त्यांचा धर्म कधी समजलाय काय? जेंव्हा दंगल घडते तेंव्हा त्याचा उदेश्य खरोखर धार्मिक असतो कि राजकीय वा व्ययक्तिक? धर्माची लोकांना गरज का आहे? धर्मानुसार प्रत्येकाचा देव वेगवेगळा असतो कि एकच? धर्माची सुरुवात कशी झाली? धर्म मानव निर्मित आहे का परमेश्वर निर्मित? जर परमेश्वर निर्मित आहे तर मग वेगवेगळी धर्म का निर्माण केली गेली? असे असंख्य प्रश्न मला पडले. त्यावर मी स्वतंत्र पणे विचार करायला लागलो. माहिती घ्यायचा प्रयत्न करू लागलो. एक मला नक्की समजलं कि जे घडलं ते काही धर्म नव्हत तर अधर्म होतं. स्वतःला धर्माचा माणूस समजणाऱ्या त्या न्हाव्याचा तो धर्म नव्हता.
क्रमशः

डॉ. सारंग कोकाटे 
sarangkokate@gmail.com